पंजाबमध्ये पूरसंकट, पंतप्रधान मोदी करणार दौरा
दौऱ्यादरम्यान मोठ्या मदतनिधीची घोषणा होण्याची शक्यता : 2,000 गावांमध्ये प्रचंड हान
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबमध्ये तीव्र पूरसंकटामुळे प्रचंड हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. 9 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये पोहोचून पूरग्रस्त भागांचा आढावा घेणार आहेत. गुरदासपूर येथे जात पंतप्रधानांकडून मदतकार्य अन् बचावमोहिमेची माहिती घेतली जाणार आहे. याचबरोबर या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांकडून मोठ्या मदतनिधीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पूरबळींची संख्या राज्यात वाढून 46 झाली असून 1.75 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांची हानी झाली आहे.
एनडीआरएफ, बीएसएफ, पंजाब पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर केले जात आहे. पंजाब मागील काही दशकांमधील सर्वात भीषण पूरसंकटाला तोंड देत आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सतलज, व्यास आणि रावी नदी तसेच मौसमी नाल्यांमधील पूरामुळे हे संकट निर्माण झाले आहे.
याचबरोबर अलिकडच्या दिवसांमध्ये पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीमळे स्थिती अधिकच गंभीर ठरली आहे, यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शनिवारी पोंग धरणातील जलपातळी किरकोळ कमी होत 1,394.19 फूट इतकी नोंद झाली, परंतु हे प्रमाण त्याची धोकादायक पातळी 1,390 फुटांपेक्षा 4 फुटांनी अधिक असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भाक्रा धरणात जलपातळी 1,678.14 फूट नेंद झाली आहे. सतजल नदीवरील या धरणातील पाण्याची आवक 62,481 क्यूसेक तर विसर्ग 52,000 क्यूसेक राहिला आहे. राज्यात आलेला हा पूर 5 दशकांमधील सर्वात भीषण आहे. पंजाब आणि शेजारच्या हिमालयीन राज्यांमध्ये सातत्याने पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील जवळपास 2000 गावे या पुरामुळे प्रभावित झाल्याचे राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी सांगितले आहे. पूरामुळे सर्वाधिक जीवितहानी म्हणजेच प्रत्येकी 7 जणांचा मृत्यू होशियारपूर आणि अमृतसर येथे झाला आहे. त्यानंतर पठाणकोटमध्ये 6, बरनाला येथे 5, लुधियाना आणि भटिंडा येथे प्रत्येकी 4, मानसा येथे 3, गुरदासपूर, रुपनगर आणि एसएएस नगरमध्ये प्रत्येकी 2, पतियाळा अन् संगरूर तसेच फाजिल्का अन् गुरदासपूर येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे. पठाणकोट जिल्ह्यामध्ये तीन जण पुरामुळे बेपत्ता झाले आहेत. फिरोजपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पाणीपातळी धोकादायक स्तरावर आहे आणि पूरसंकट कायम राहिल्याने ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत. आतापर्यंत 22,854 लोकांना पूरग्रस्त भागांमधून अन्यत्र हलविण्यात आले आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषिक्षेत्राचे 18 जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर पायाभूत सुविधा, घरे आणि पशूधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. तर घग्गर नदीने 750 फुटांची धोकादायक पातळी ओलांडल्याने पूरसंकट तीव्र झाले आहे. राज्य सरकारने या अभूतपूर्व पूरानंतर त्वरित पावले उचलत संवेदनशील भूमिका अवलंबिली असल्याचा दावा चीमा यांनी केला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमुवर राजकीय संधीसाधूपणा साधण्याऐवजी सहकार्यात्मक प्रतिक्रियेची आवश्यकता असल्याचे चीमा यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटले आहे. राज्य सरकारने वेगवान आणि समन्वित पद्धतीने पावले उचलली असून राज्यभरात सुमारे 200 मदतशिबिरांची स्थापना करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या 24 तर एसडीआरएफच्या 2 पथकांकडून 144 नौकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य राबविले जात असल्याचे चीमा यांनी सांगितले.