आरसीयुतील समस्या त्वरित दूर करा
अभाविपची कुलगुरुंकडे मागणी
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठात अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असून त्या त्वरित दूर कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव शहर शाखेने केली आहे. परिषदेच्या सदस्यांनी शुक्रवार दि. 9 रोजी कुलगुरुंची भेट घेऊन समस्या मांडल्या. विद्यापीठात प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होत आहे. शुल्कात कपात करण्यात यावी, युयुसीएमएस या सॉफ्टवेअरद्वारे प्रवेश प्रक्रिया व परीक्षा शुल्क भरण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे. पण ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन ते तीनवेळा विद्यापीठाकडे शुल्क भरणा करावी लागत आहे. सॉफ्टवेअरमध्ये झालेला बिघाड त्वरित दूर करण्यात यावा. परीक्षेचा निकाल विलंब न करता वेळीच जाहीर करण्यात यावा. गुणपत्रक देण्याची व्यवस्था करावी, उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन व फेरमूल्यांकन व्यवस्थितपणे व्हावे, अशा मागण्याही विद्यार्थी सदस्यांनी कुलगुरुंसमोर मांडल्या.