मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू
अहमदनगर: शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये पडलेल्या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एका मागून एक अशा पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले. त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाकडी (ता. नेवासे) येथे मंगळवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बबलू काळे (वय २८), अनिल काळे (वय ५५), माणिक काळे (वय ६५), संदीप काळे (वय ३२), बाबासाहेब गायकवाड (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. नगर येथील रुग्णालयात विजय काळे (वय ३५) उपचार घेत आहेत. वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत जुनी विहीर आहे. कमी खोली असल्याने त्यामध्ये जनावरांचे शेण मलमूत्र साठवले होते. या विहिरीमध्ये मांजर पडले. त्याला वाचविण्यासाठी विशाल ऊर्फ बबलू काळे (वय २३) विहिरीत उतरला. तो बाहेर आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे विहिरीत उतरले. तेही वर आले नाही, हे पाहून शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत. अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्याने जात होते. त्यांना आवाज आल्याने मदतीला विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत. हे पाहून त्यांचे वडील माणिक काळे विहिरीत उतरले. तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले. या दरम्यान विजय काळे कमरेला दोर लावून विहिरीत उतरला. विषारी वायूचे लक्षणे जाणवताच त्याने आवाज दिला. लोकांनी त्याला वर काढले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.