पाच किलो तांदळासोबत डाळ, साखर, खाद्यतेल
अन्नभाग्य योजनेतील निर्णयाविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
बेंगळूर : कर्नाटकाला भूकमुक्त राज्य बनविण्यासाठी आपल्या सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. 5 किलो तांदळासोबत आहार किट वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. गुरुवारी बेंगळूरमधील विधानसौध सभागृहात अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने आयोजिलेल्या जागतिक आहार दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. अनेकांना अन्नाचे महत्त्व अजूनही समजलेले नाही. देशभरात अन्नाविषयी जनतेत जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. दररोज जगभरात भुकेमुळे 19,700 जणांचा मृत्यू होतो. मात्र, अन्नाचे महत्त्व माहीत नसल्यामुळे अनेकजण आहार विनाकारण वाया घालवतात.
मला अन्नाचे महत्त्व माहीत असल्यामुळे कर्नाटकाला भूकमुक्त राज्य बनविण्यासाठी अन्नभाग्य योजना जारी केली. सुरुवातीला प्रत्येकी 5 किलो तांदूळ दिले जात होते. आता 10 किलो तांदूळ वितरित केले जाते. अलीकडे रेशन तांदळाचा काळाबाजार होत असल्याचे आढळल्याने पाच किलो तांदळासोबत साखर, मीठ, तूरडाळ, खाद्यतेल यासारखे आहार पदार्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आहार उत्पादनात आम्ही स्वावलंबी झालो आहोत. मात्र, विवाह, वाढदिवस तसेच इतर समारंभ, हॉटेलमध्ये अन्नपदार्थांची नासाडी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ही चिंतेची बाब आहे. जीकेव्हीके संस्थेने केलेल्या अध्ययनानुसार एकट्या बेंगळूरमध्येच दरवर्षी 943 टन आहार वाया घालविला जात आहे. साधारणत: 360 कोटी रुपये किमतीचे आहार पदार्थ वाया घालवत आहोत, असेही त्यांनी सांगितले.