भारत जोडो न्याय यात्रेत पाच दिवसांचा ‘ब्रेक’
राहुल गांधी जाणार विदेश दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा 26 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. या काळात राहुल गांधी विदेश दौऱ्यावर असतील. राहुल गांधींना लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात व्याख्यानासाठी निमंत्रण असल्यामुळे पाच दिवस यात्रेला ‘ब्रेक’ दिला जाणार आहे. सध्या ही यात्रा उत्तर प्रदेशात आहे. राहुल गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर 2 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा राजस्थानमार्गे मध्यप्रदेशात पोहोचेल. मणिपूरपासून सुरू झालेला भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास मुंबईत संपणार आहे. ही यात्रा 15 राज्यांतून 6,700 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी (20 फेब्रुवारी) लखनौमध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधींसोबत प्रदेशाध्यक्ष अजय रायही उपस्थित होते. लखनौमध्ये पोहोचताच लोकांनी राहुल गांधींचे ठिकठिकाणी स्वागत केले. रात्री साडेआठ वाजता यात्रा घंटाघर येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकरी, मजूर आणि बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला. या देशात न्याय फक्त अब्जाधीशांना असून गरिबांना न्याय मिळू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.