मत्स्य व्यवसायिकांनी योजनांचा लाभ घ्यावा
पाटण :
भोई समाज हा मागासलेला असून या समाजातील अनेक बांधव आजही पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना सेवासुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. मात्र शासनाने पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. भोई समाजातील बांधवांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपले आर्थिक जीवनमान उंचवावे, असे आवाहन सातारा जिल्हा मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप सुर्वे यांनी केले.
रामापूर (पाटण) येथील नवउदय मच्छीमार सहकारी संस्थेतील सभासदांना जाळी वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा सहाय्यक आयुक्त जीवन देवकर, नगरसेवक उमेश टोळे यांच्या हस्ते संस्थेतील सभासदांना जाळी वाटप करण्यात आले.
प्रदीप सुर्वे म्हणाले, भोई बांधव मोठ्या संख्येने आजही पारंपरिक मत्स्य व्यवसाय करत आहेत. या पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांचा आर्थिकस्तर उंचावून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी शासन धोरण राबवत आहे. यासाठी मत्स्य व्यवसाय साहित्यही उपलब्ध करून दिले जात असून यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नवउदय मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक काटवटे यांनी स्वागत व आभार मानले. कार्यक्रमास व्हाइस चेअरमन विष्णू खैरमोडे, मुरलीधर खैरमोडे, प्रल्हाद खैरमोडे, शशिकांत सुपेकर, अरविंद खैरमोडे, तानाजीराव खैरमोडे, सतीश खैरमोडे, विजय खैरमोडे, प्रकाश खैरमोडे, रोहित खैरमोडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.