पहिली बिम्सटेक शिखर परिषद आजपासून
व्यापारासोबत क्षेत्रीय सहकार्याला चालना देणे उद्देश : राजधानी दिल्लीत होणार आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 6-8 ऑगस्ट या कालावधीत राजधानी नवी दिल्लीत पहिल्या बिम्सटेक बिझनेस शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. विदेश मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) सहकार्याने तीन दिवसीय या परिषदेचे हे आयोजन केले जाणार आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर हे व्यापार शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. शिखर परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल तसेच अन्य वरिष्ठ नेते स्वत:चे म्हणणे मांडणार असल्याचे विदेश मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
या परिषदेत व्यापार, वाणिज्य-उद्योग आणि ऊर्जा क्षेत्राच्या बिम्सटेक सदस्य देशांचे अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरण निर्माते, उद्योजक आणि उद्योग संस्था भाग घेणार आहेत. व्यापार शिखर परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचा उद्देश बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बिम्सटेकच्या सदस्य देशांदरम्यान मजबूत व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या माध्यमातून अधिक क्षेत्रीय सहकार्याला चालना देणे असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
या आयोजनात बंगालच्या उपसागर क्षेत्रातील 300 हून अधिक प्रमुख हितधारकांना एका व्यासपीठावर एकत्र आणले जाणार आहे. यामुळे आर्थिक सहकार्य निर्माण करणे सोपे ठरणार आहे. तसेच व्यापार सुलभता, क्षेत्रीय संपर्क, ऊर्जा सुरक्षा, समावेशक विकास आणि निरंतर विकास यासारख्या लक्षकेंद्रीत क्षेत्रांमध्ये पुढील वाटचाल करण्यासाठी मार्ग शोधले जाणार आहेत.
बिम्सटेकला भारताचे महत्त्व
भारत बिम्सटेकला अत्यंत अधिक महत्त्व देतो. बिम्सटेक दक्षिण आशियातील पाच देश (बांगलादेश, भूतान, नेपाळ, भारत आणि श्रीलंका) आणि दक्षिणपूर्व आशियातील दोन देशांना (म्यानमार आणि थायलंड) जोडत असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.