गवतगंज्यांना लागलेल्या आगीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत
वेल्डिंग करतेवेळी नकळत ज्यांच्याकडून चूक झाली त्यांनी दाखवली माणुसकी
त.भा.वार्ताहर
उचगाव : येथील भातवाडा परिसरात शुक्रवारी लागलेल्या आगीत गवतगंज्या, बटाटे आणि जनावरांचा कडबा जळून खाक झाला. यामध्ये जनावरांचे हाल होऊ नयेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा कोठून तरी जनावरांचा चारा उपलब्ध करून घेण्याच्या उद्देशाने मदतीचा हात म्हणून ज्यांच्याकडून नकळत वेल्डिंगचे काम करतेवेळी ठिणगी उडून गवतगंज्या पेटून नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याच्या या घटनेने उचगावमधील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
उचगावमध्ये शुक्रवारी दुपारी गवतगंज्यांच्या शेजारी घराच्या छताचे वेल्डिंगचे काम सुरू असताना अकस्मात नकळत ठिणगी पडून गवतगंज्या पेटून जवळपास दोन ते अडीच लाखाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली होती. यावेळी वेल्डिंगचे काम करणाऱ्या जावेद जमादार, समद ताशीलदार आणि इमाम ताशीलदार यांनी सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये मुख्य म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. तसेच बटाटे यांचेही मोठे नुकसान झाले होते. यासाठी त्यांनी झालेली नुकसान भरपाई आपण भरून देण्याचे कबूल करून ती रक्कम शनिवारी नुकसानग्रस्त शेतकरी मनोहर महादेव जाधव, तुषार अनिल जाधव यांना देण्यात आली. यासाठी अमर जाधव, शरद जाधव व शशिकांत जाधव यांच्या मध्यस्थीला यश आले. या घटनेच्या संदर्भात समाधान व्यक्त करण्यात आले आहे .