For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप नेत्याच्या हत्याप्रकरणात पंधरा जणांना फाशीची शिक्षा

06:50 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप नेत्याच्या हत्याप्रकरणात पंधरा जणांना फाशीची शिक्षा
Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची हत्या केल्याचा आरोप सिद्ध : केरळमधील प्रथमच घटना

Advertisement

वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम

केरळ राज्यातील अलेप्पुझा शहरात भारतीय जनता पक्षाचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची हत्या करणाऱ्या पीएफआय या इस्लामी संघटनेच्या 15 हस्तकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मावेलिक्कारा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. जी. श्रीदेवी यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. केरळ राज्याच्या इतिहासात इतक्या आरोपींना एकाचवेळी फाशीची शिक्षा ठोठावली जाण्याची ही प्रथमच वेळ आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Advertisement

नसीम (कोमलापुरम), अजमल (मन्ननचेरी), अनूप (अलेप्पुझा पश्चिम), मोहम्मद अस्लम (अय्याद ठेकू), अब्दुल कलाम (मन्ननचेरी), अब्दुल कलाम (आदीवरम), सफरुद्दिन (अलेप्पुझा पश्चिम), मनशाद (मन्ननचेरी), जसीब रझा (अलेप्पुझा पश्चिम), नवाझ (मुलक्कल), समीर (कोमलापुरम), नसीर (मन्ननचेरी उत्तर), झाकीर हुसेन (मन्ननचेरी), शाजी (ठेक्केवेलियल) आणि शेहनाझ अस्लम (मुलक्कल) अशी फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दक्षिण भारतात जाळे

पीएफआय ही संघटना प्रामुख्याने केरळमध्ये कार्यरत होती. आता या संघटनेवर देशव्यापी बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही आपली पाळेमुळे पसरविली आहेत. ही संघटना अवैध धर्मांतरे घडविण्यात आघाडीवर असल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘सिमी’ या संघटनेचेच हे नवे रुप होते. सिमीवर 2008 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्या संघटनेच्या हस्तकांनी पीएफआय संघटना स्थापन केली होती. आता या संघटनेवरही बंदी घालण्यात आली आहे.

निर्घृण हत्या

रणजीत श्रीनिवासन यांची 19 डिसेंबर 2021 या दिवशी त्यांच्या राहत्या घरी, त्यांची पत्नी, आई आणि अपत्यासमोर निर्घृणपणे तलवारीने तोडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे केवळ केरळच नव्हे, तर सारा देश हादरला होता. या हत्येच्या आदल्या दिवशी एसडीपीआय या संघटनेच्या राज्य सचिवाची हत्या झाली होती. ही हत्या श्रीनिवासन यांनीच केल्याचा पीएफआय या संघटनेला संशय होता. त्यामुळे सूड उगविण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली होती, असे सांगण्यात येत होते. तथापि, एसडीपीआय हस्तकाच्या हत्येत श्रीनिवासन यांचा हात असल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. तरीही त्यांना नाहक जीव गमवावा लागला होता. या हत्येचे दूरगामी पडसाद उमटले होते. केरळ सरकारच्या दुर्लक्षामुळेच पीएफआय या राज्यात पसरल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement
Tags :

.