पराभवाच्या भीतीमुळेच ज्वलंत मुद्यांना बगल
काँग्रेसचे पवन खेरा यांचे भाजपवर टीकास्र : गोव्याच्या अस्मितेचा आम्हाला अभिमान
पणजी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती सतावू लागली आहे. म्हणूनच त्यांनी ज्वलंत मुद्यांपासून लोकांचे मन वळविण्यास आणि जास्तीत जास्त खोटे पसरवण्यास सुऊवात केली आहे, अशी टीका काँग्रेसचे माध्यम प्रभारी पवन खेरा यांनी केली आहे. गुऊवारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राष्ट्रीय माध्यम समन्वयक हर्षद शर्मा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर आणि माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी, भाजपने आमदार आयात करून आणि विरोधकांना कमकुवत करून लोकशाहीची चेष्टा केली आहे. अशावेळी पक्षांतरविरोधी कायदा मजबूत झाल्यास कोणीही पक्ष बदलण्याचे धाडस करणार नाही. एकदा हा कायदा मजबूत झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे राहणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.
...अन्यथा गोव्याची अस्मिता संपुष्टात
भाजप सरकार सध्या आपल्या भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यातील जमिनीचे ऊपांतर करत आहे. त्यातून आतापर्यंत मोठमोठ्या जमिनी रूपांतरित झालेल्या आहेत. यातून येथील निसर्गाचा ऱ्हास होत असून त्यापासून भाजपला रोखले पाहिजे. गोव्याच्या अस्मितेचा आम्हाला अभिमान असून ही अस्मिता जपली पाहिजे. भारताच्या मुकुटातील अनमोल हिरा अशी आगळी ओळख आणि अनोख्या जैवविविधतेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याचे रक्षण, संरक्षण आणि भावी पिढीसाठी जतन करायचे असेल तर भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
मोदींना गोव्याचे बनवायचे आहे ‘कोल हब’
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मित्रांचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले. त्यांना आता पुन्हा केवळ या भांडवलदारांसाठीच सरकार बनवायचे आहे. मोदी यांना गोव्याचे ‘कोल हब’ बनवायचे आहे. त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून दक्षिण गोव्यात भांडवलदार उमेदवार उभा केला आहे. हा उमेदवार त्यांच्या भांडवलदार मित्रांसाठी काम करणार आहे. सामान्यांसाठी नव्हे. म्हणून त्याचा पराभव झाला पाहिजे, असे खेरा म्हणाले.
भाजपने गाठली खालची पातळी
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू खासदार प्रज्वल रेवण्णा याचा कथित सहभाग असलेला लैंगिक छळ प्रकरण हा जगातील सर्वात मोठा लैंगिक गुन्हा आहे. म्हणूनच या प्रकरणी एसआयटी स्थापन होताक्षणीच तो विदेशात पळून गेला. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पंतप्रधानांना आहे. तरीही केवळ सत्ता मिळविण्यासाठी ते त्यांना पाठिशी घालत असून भाजप एवढ्या खालच्या पातळीवर गेला आहे, असा आरोप खेरा यांनी केला.