किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांचे रेल्वेस्थानकासमोर आंदोलन
बेळगाव : उत्पादनाच्या किमान आधारभूत किमतीसाठी शुक्रवारी फेडरेशन ऑफ स्टेट फार्मर्स ऑर्गनायझेशनच्यावतीने बेळगाव रेल्वेस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली जात असून, डॉ. स्वामीनाथन यांच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. केंद्र सरकारच्या नवीन नियमांमुळे कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहेत. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनामध्ये केंद्र सरकारने अंमलबजावणी केलेल्या तीन कायद्यांना मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा शेतकऱ्यांना एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, अद्याप याची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आगपाखड केली. शुक्रवारी सकाळपासूनच रेल्वेस्थानकासमोर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त लावला होता. जोवर मागणी मान्य होणार नाही, तोवर हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यामध्ये जिल्हाभरातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.