‘त्या’ योजनेबाबत शेतकऱ्यांचा विरोध कायम
शेतकरी अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत
बेळगाव : कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनीमध्ये बुडाने दडपशाही करत खांब रोवले. मात्र शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. असे असताना काही राजकीय व्यक्ती आणि रिअल इस्टेटधारक बुडाला सहकार्य करून शेतकऱ्यांवर नांगर फिरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच बुडाच्या विरोधात उच्चन्यायालयात अवमान याचिकाही दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. कणबर्गी येथील 25 एकर जमिनीबाबत न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे. असे असताना बुडा त्या ठिकाणी स्कीम क्रमांक 61 राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. महत्त्वाचे म्हणजे बुडाने ही स्कीम राबविण्यासाठी नोटिफिकेशन दिले. त्यानंतर त्या जागेमध्ये अनेकांनी घरे बांधली आहेत तर काही जणांनी जमिनी खरेदी-विक्री देखील केली आहे. या स्कीममध्ये मोठा गैरप्रकार घडला आहे. यापूर्वीच्या बुडा आयुक्तांनीही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जमीन कब्जात घेण्याचा प्रयत्न केला होता.
सध्या न्यायालयात खटला सुरू असताना शेतकऱ्यांच्या त्या जमिनीमध्येही खांब लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला असून खांबही काढून टाकले आहेत. मात्र काही रिअल इस्टेटधारक आणि राजकीय व्यक्ती चुकीची माहिती पसरवत आहेत. असा आरोप शेतकरी करत आहेत. आम्ही कदापिही जमीन देणार नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनीही बुडा आयुक्तांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. बुडा स्कीम राबविताना नोटिफिकेशन देत असते. त्या नोटिफिकेशननुसारच संपूर्ण काम झाले पाहिजे. मात्र नोटिफिकेशन जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे काही जणांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न सुरू आहे. शेतकरी पुन्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही या योजनेला विरोध करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.