प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या भूमी अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध; अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : नव्याने होऊ घातलेल्या बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, के. के. कोप्प, हलगीमर्डी, नागेन्नहट्टी यासह परिसरातील शेतकऱ्यांना बेळगाव-धारवाड प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी भूमीअधिग्रहण खात्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी बेळगाव येथील रेल्वे भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांना भेटून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत भूमी अधिग्रहण होऊ देणार नाही, अशा आशयाचे निवेदन दिले. भूमि अधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोबर यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत योग्य सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन दिले. बेळगाव धारवाड नव्याने रेल्वेमार्गसाठी गर्लगुंजी, के.के. कोप्प, नद्दीहळ्ळी, हलगीमर्डी, नागेन्नहट्टी यासह इतर गावातील सुपीक जमीन अधिग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या विरोधात शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे.
नवीन रेल्वेमार्ग हा सुपीक जमिनीतून नेण्यापेक्षा नापीक जमीन अधिग्रहण करून या जमिनीतून हा मार्ग काढावा यासाठी गेल्या सात वर्षापासून या प्रकल्पाला भागातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वेळोवेळी भूमी अधिग्रहणला विरोध करण्यात आलेला आहे. पुन्हा नोटिसी बजावून भूमी अधिग्रहण करण्याचा डाव शासनाने घातला आहे. नुकताच या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नोटिसी बजावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध केला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला विरोध केला जाईल आणि उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रसाद पाटील यांनी दिला आहे.यावेळी शेतकरी सुनील पाटील, संतोष पाटील, मारुती लोकूर, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव, कृष्णा सिद्धानी, सुधाकर पाटील यासह के. .के. कोप्प, गर्लगुंजी, हलगीमर्डी, नागेनहट्टीतील शेतकरी हजर होते.