पावसाअभावी राज्यातील शेतकरी अडचणीत
पणजी /विशेष प्रतिनिधी
पावसाअभावी राज्यातील शेतकरी अडचणीत आले असून पुढील चार दिवसात गोव्यात तुरळ पावसाची शक्यता दिसून येते. गोव्याकडे पावसाचे ढग सरकत आहेत आणि पावसासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झालेले आहे, मात्र बुधवारी अत्यंत तुरळक असा पाऊस पडून गेला.
गेले सहा दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकयांना जवळपास असलेल्या शेततळीतून पाणी काढून ते भात पिकांना देण्याची पाळी आली. अनेक ठिकाणी नदीतून पाणी काढून ते भातरोपांना देण्यात आले. अन्यथा भाताची रोपे करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गोव्यातील काकडी उत्पादक शेतकरी देखील सध्या मिळेल तिथून पाणी आणून ते वेलीना देत आहेत. सध्या काकडी उत्पादक तसेच भेंडी उत्पादक देखील फारच अडचणीत आलेले आहेत.
गोव्यात बुधवारी पणजीसह वाळपई, साखळी, धारबांदोडा, जुने गोवे, फोंडा, मडगाव, पेडणे, सांगे या भागात तुरळक पाऊस झाला. केवळ झाडांची पाने ओलसर झाली. अन्यथा झाडांना आवश्यक आहे तेवढा देखील पाऊस पडला नाही, मात्र पहाटेपासून काळ्याकुट्ट ढगांनी आकाश अच्छादिले होते. प्रत्यक्षात मात्र फारच कमी पाऊस पडला. आषाढाच्या पहिल्या दिवशी जिथे पावसाचा उच्छाद असतो त्या ठिकाणी केवळ तुरळक पावसाच्या सरी पडून गेल्या.