Solapur News | सोलापूरमध्ये कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले
सोलापूर कृषी बाजार समितीत भाव खाली
सोलापूर | बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. काद्याला शंभर ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अनेक शेतकरी कांद्याच्या पिकांत नांगर फिरवून नष्ट करत आहेत. गतवर्षी सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नियोजन चुकले. पावसाळा फार उशीराने संपल्याने त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. दोन पैसे हाती लागतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा पिकांची लागवड केली. मात्र तसे पाहिल्यास कांदा पिकाची लागवड केल्यानंतर त्यांच्या उत्पादनापर्यंत प्रति हेक्टरी येणारा खर्चसुध्दा निघेनासा झाला आहे.
सध्या कांद्याला बाजारात उठाव नाही. त्यातच सध्या उत्पादित झालेल्या कांद्यावरील सालपट निघते. त्यामुळे कांदा व्यवस्थित दर्जाचा उत्पादित होत नाही. त्यातच सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक होणाराकांदा हा लोकल आहे. इंदापूर, माढा, करमाळा धाराशिव या भागातील कांदा येत असल्यामुळे कांदा शंभर ते सतराशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. सतराशे रुपये दराने जाणारा कांदा हा चांगल्या प्रतीचा व वाळलेला आहे. त्यामुळे थोडाफार भाव मिळत आहे. अनेक शेतकरी भाव नसल्यामुळे कांदा बाजारात घेऊन येणे बंद केले आहे. सध्या टोमॅटो व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गत एकसारखी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कांदा उत्पादक
शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.