शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ 29 पर्यंत लांबणीवर
आंदोलकांचे अजूनही दिल्लीच्या सीमेवरच ठाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेतकरी आंदोलकांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाकडून पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहेत. ‘दिल्ली मार्च’ 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याच्या शेतकरी नेत्यांच्या निर्णयानंतर दिल्ली पोलिसांनी सिंघू आणि टिकरी सीमा उघडल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. आता येत्या तीन-चार दिवसात सरकार कोणता निर्णय घेते यावर शेतकरी आंदोलकांची पुढील दिशा ठरणार आहे.
शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेले असतानाच दुसरीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केंद्राने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांच्या लोकशाही अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकरी शांततेने आंदोलन करत असून केंद्र आणि संबंधित राज्य सरकारला शेतकऱ्यांशी योग्य वर्तन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे म्हटले आहे.
शेतकरी संघटनांमध्ये विसंवाद
‘दिल्ली चलो’चे आवाहन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या विनंतीवरून पंजाबमधील हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना होण्याच्या पवित्र्यात आहेत. मात्र संघटनांमधील वैचारिक मतभेदांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पंजाबमधील काही शेतकरी संघटना या आंदोलनापासून दूर राहिल्यामुळे आंदोलनात विसंवाद असल्याचे दिसत आहे.