बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
शेतकऱ्यांनीच सुचवला नवीन मार्ग : डोंगराळ भागातून रेल्वेमार्ग केल्यास 6 कि. मी. अंतर कमी होणार
बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी खासदार जगदीश शेट्टर, तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून नुकतीच बैठक घेण्यात आली. परंतु, रेल्वेमार्गासाठी सुपीक जमीन घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांनी डेंगराळ भागातून जाणारा नवा मार्ग सुचवला असून त्यातून 6 किलोमीटरचे अंतर कमी होणार असले तरी केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी हा रेल्वेमार्ग केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सध्या असलेला बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग लोंढामार्गे आहे. हा रेल्वेमार्ग घनदाट जंगलातून असल्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे रेल्वेच्या वेगावर मर्यादा येतात. तसेच हा रेल्वेमार्ग वळसा घालून जात असल्याने प्रवासाचा वेळ वाढतो. या ऐवजी बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला. हा रेल्वेमार्ग बेळगावच्या देसूर रेल्वेस्थानकापासून गर्लगुंजी, के. के. कोप्प मार्गे कित्तूरला जोडला जाणार आहे. परंतु, गर्लगुंजी, नंदिहळ्ळी, के. के. कोप्प, नागेनहाळ येथील सुपीक जमीन संपादित केली जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे.
लोंढा-बेळगाव रेल्वेमार्गासाठी अवाढव्य खर्च का?
सरकारला कित्तूरमार्गे नवीन रेल्वेमार्ग करायचा होता, तरीदेखील बेळगाव-लोंढा-धारवाड या रेल्वेमार्गासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. जर नवीन रेल्वेमार्ग करायचा होता तर जुन्या रेल्वेमार्गासाठी सरकारने इतका खर्च का केला? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या रेल्वेमार्गात नागेनहाळ ते के. के. कोप्प दरम्यानच रेल्वेस्थानक करण्याचा घाट का घातला जात आहे? या प्रश्नाचे सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केआयडीबीकडे आक्षेप नोंदवूनही रस्त्याचे काम रेटण्याचा प्रकार
![]()
बेळगाव-धारवाड नव्या रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी सुचवलेला रेल्वेमार्ग हा 6 कि. मी. अंतर कमी करणारा असल्याने सरकारने याचा विचार करावा. तसेच रेल्वेने सुचवलेल्या रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांनी केआयडीबीकडे आक्षेप नोंदवूनही रस्त्याचे काम रेटले जात आहे.
- प्रसाद पाटील, शेतकरी