शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशीसाठी मुदतवाढ
प्रतिनिधी/ पणजी
शिरगाव जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सत्य शोधक समितीने सरकारकडे आणखी तीन दिवसांची मुदत मागितली असून सरकारने ती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गुऊवारपर्यंत हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.
महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सत्यशोधक समिती स्थापन केली आहे. तिला अहवाल देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु त्या मुदतीत सर्व बाजूंनी चौकशी करणे शक्य नाही, म्हणून आणखी तीन दिवस वाढवून देण्याची मागणी जॅकीस यांनी केली आहे.
सध्या जत्रेत कोणत्याही प्रकारची शिस्त नव्हती हे एक प्रमुख कारण समितीसमोर आल्याचे उघड झाले आहे. चेंगराचेंगरीचे ठिकाण, तेथील साक्षीदार यांच्याकडून माहिती घेण्याचे काम समिती करीत असून चेंगराचेंगरीपूर्वी नेमके काय घडले, सुरूवात कशामुळे झाली, पोलिसांनी दुर्लक्ष केले की नाही? अशा विविध मुद्द्यांचा विचार समितीने चालवला असून जत्रेसाठी नेमलेले पोलिस आणि इतर सरकारी अधिकारी यांचेही म्हणणे विचारात घेतले जाणार आहे.