औषध प्रकल्पात विस्फोट, 9 जण अद्याप बेपत्ता
वृत्तसंस्था/हैदराबाद
तेलंगणाच्या पशम्यलारम येथे सिगाची इंडस्ट्रीजमध्ये औषध कंपनीच्या प्रकल्पात झालेल्या विस्फोटानंतर 9 जण अद्याप बेपत्ता आहेत. यातील 5 कामगार हे ओडिशाचे रहिवासी आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. विस्फोटाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारचे विशेष पथक गुरुवारी घटनास्थळी दाखल झाले. विस्फोटात आतापर्यंत 40 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला. दुर्घटनेनंतर अद्याप 9 जण बेपत्ता आहेत. फॉरेन्सिक सायन्स लॅबकडून अहवाल प्राप्त झाल्यावरच याप्रकरणी स्थिती स्पष्ट होणार आहे. ढिगारा हटविण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील काळात आणखी मृतदेह हाती लागण्याची शक्यता नाही अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
विस्फोटात ओडिशाच्या 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण बेपत्ता आहेत. 4 बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांनी डीएनए नमुने दिले आहेत. बेपत्ता कामगारांमध्ये नवरंगपूर जिल्ह्यातील दोन, गंजम येथे 2 आणि कटक येथील एक कामगार सामील असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनानुसार विस्फोटावेळी प्रकल्पात 143 जण काम करत होते. ओडिशाचे काही रहिवासी प्रकल्पाच्या वेगवेगळ्या विभागात काम करत होते, यातील 4 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे, तर 5 जण अद्याप बेपत्ता आहेत. गंजम जिल्ह्dयातील जगनमोहन, कटक जिल्ह्यातील लग्नजीत दुआरी, बालासोर जिल्ह्यातील मनोज राउत, जाजपूर येथील डोलगोविंद साहू यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती ओडिशा परिवार संचालनालयाचे विशेष कार्य अधिकारी प्रीतिश पांडा यांनी दिली.
एक महिन्यात अहवाल
दुर्घटनेच्या चौकशीसाठी तेलंगणा सरकारने विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाचे नेतृत्व सीएसआयआर-भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बी. वेंकटेश्वर राव करणार आहेत. हे पथक एक महिन्याच्या आत राज्य सरकारला विशिष्ट सूचना अणि शिफारसींसह एक विस्तृत अहवाल सादर करणार आहे.