कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्ता पार करताना कसरत
अरूंद रस्त्यामुळे बसचालकांची उडाली धांदल : रस्ता धोकादायक बनल्याने वाहनधारकांचे हाल : रुंदीकरणाची गरज
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर-बेळगाव शहराकडे जाणारा मुख्य रस्ता बस वाहतुकीला धोकादायक बनला आहे. येथील साई कॉलनीच्या खालील रस्ता तर बसवाहतूक करताना चालकांना जीव मुठीत घेवून तारेवरची कसरत करत बस चालवावी लागत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून रस्ता रुंदीकरण करून प्रवासीवर्ग व बसचालकांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर या अरुंद रस्त्यावरुन परिवहन मंडळाच्या बसेस धावत असतात. परिवहन मंडळाने कंग्राळी बुद्रुक गावासाठी शाहूनगरमार्गे तसेच केएलई हॉस्पिटलमार्गे दोन्हीकडून बसेस सोडून गावातील शालेय विद्यार्थीवर्गाबरोबर इतर प्रवासीवर्गाची चांगली सोय केली आहे. यासाठी दोन्हीकडून धावणाऱ्या बसेसमुळे कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर, अजमनगर, गौंडवाड, यमनापूर, वैभवनगर, के.एल.ई. हॉस्पिटल आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवासीवर्ग व इतरांना चांगली सोय केली आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर रस्त्यावरुन मात्र बसचालकांना तारेवरची कसरत करत प्रवासीवर्गाचा जीव मुठीत घेवून बस चालवावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
महिन्यापूर्वी कार पलटी
कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे लक्ष नसल्यामुळे मोठी वाहने यामध्ये ट्रक, डंपर, कार, बस समोरासमोर आल्यावर अरुंद रस्ता असल्यामुळे अगदी रस्त्याकडेला आपल्या वाहनाला साईड काढावी लागत आहे. यावेळी एक वाहन घसरले तर मोठी दुर्घटना घडणार आहे. मागील महिन्यामध्ये बेळगावहून कंग्राळीकडे येणाऱ्या बसला साईड देताना एक कार गटारीमध्येच पलटी झाली. सुदैवाने जीवितहानी किंवा कोणी जखमी झाले नाही. रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच कारचालकाला बाहेर काढले. अशी घटना प्रवासीवर्गाने भरलेल्या एखाद्या बसची झाली तर मोठा अनर्थ घडेल. तेंव्हा पुढील धोका ओळखून ग्राम पंचायतीबरोबर इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देवून रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रस्ता रुंदीकरण मोहीम रोडावली
दोन वर्षांपूर्वी कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं.च्या पुढाकाराने शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक गावापर्यंतच्या या दीड-दोन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरणाची मोहीम राबविण्यात आली. पूर्वीच्या रस्त्यांच्या मध्यापासून पूर्व दिशेला 30 फूट व पश्चिम बाजुला 30 फूट असा 60 फूट रुंदीचा रस्ता करणार म्हणून ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी यांनी रस्त्याचे मार्किंग केले. या रस्त्यासाठी पूर्व पश्चिम बाजुकडील शेतकरी वर्गाने आपली शेतजमीन देवून सहकार्य करण्याचेही सांगितले. परंतु अजून रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. प्रवासीवर्गाबरोबर वाहनधारकांना या अरुंद रस्त्यावरुन जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागत आहेत. परंतु हे सारे काही रस्ता रुंद झाल्यावरच थांबणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.