स्वदेशनिर्मित रणगाडा इंजिनाचे परीक्षण
1,500 अश्वशक्तीचे इंजिन : म्हैसूर येथील बीईएमएल सार्वजनिक कंपनीकडून निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आत्मनिर्भरतेच्या मार्गावर अग्रेसर असलेल्या भारताने आता रणगाड्याचे इंजिन निर्माण करण्यात यश मिळविले आहे. या इंजिनाचे यशस्वी परीक्षण बुधवारी करण्यात आले. या संपूर्णपणे स्वदेशी इंजिनाची निर्मिती म्हैसूर येथील बीईएमएल या सार्वजनिक कंपनीने केली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताने स्वबळावर असे इंजिन निर्माण करण्यात यश मिळविले आहे. हे 1,500 अश्वशक्तीचे इंजिन आहे.
संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक स्वयंपूर्णता साध्य करण्याचा भारताचा प्रयत्न असून रणगाडा इंजिनाची निर्मिती हा या मार्गावरचा एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. भारताने निर्माण केलेले हे इंजिन अत्याधुनिक असून सर्व हवामानांमध्ये ते समान रितीने कार्यरत राहू शकते. जगातील सर्वोत्तम रणगाडा इंजिनाइतकीच त्याची क्षमता आहे, अशी माहिती संरक्षण विभागाचे सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली.
भारताची क्षमता सिद्ध
संरक्षण क्षेत्रात भारत वेगाने आत्मनिर्भर होत आहे. रणगाडा इंजिनाची निर्मिती हे या प्रगतीचे एक उदाहरण आहे. आतापर्यंत भारताला रणगाडा इंजिनासाठी रशियाच्या तंत्रज्ञानावर अवलंबून रहावे लागत होते. अजूनही हीच स्थिती आहे. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये भारत मोठ्या प्रमाणावर स्वत:चीच रणगाडा इंजिने निर्माण करण्यात सक्षम होणार आहे. त्यामुळे आपले परावलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन रणगाडा निर्मिती, दुरुस्ती तसेच सुट्या भागांची निर्मिती वास्तव खर्चात शक्य होणार आहे, असेही प्रतिपादन अरमाने यांनी केले.
वेळेपूर्वीच प्रकल्प पूर्ण
रणगाडा इंजिन निर्मितीचा प्रकल्प भारताने नियोजित कालावधीच्या आधीच पूर्ण केला आहे. पूर्वनिर्धारित कालावधीनुसार तो 2025 च्या अखेरीस पूर्ण होणार होता. मात्र, तो या कालावधीच्या आधीच दीड वर्षे पूर्ण झाला आहे. आता आणखी काही परीक्षणे पूर्ण झाल्यानंतर इंजिनांचे व्यापारी उत्पादन हाती घेण्यात येणार आहे. नंतरच्या काळात भारत या इंजिनांची निर्यात करण्याची शक्यताही आहे.