महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय फुटबॉलचा ‘सबकुछ’...सुनील छेत्री !

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय फुटबॉल म्हटल्यानंतर मागील दशकभरात नाव समोर यायचं ते सुनील छेत्रीचंच....राष्ट्रीय संघातील आघाडीपटू नि कर्णधार म्हणून त्याची  कामगिरी राहिली ती त्यास साजेशीच...आता अनेक वर्षं हा भार वाहिल्यानंतर छेत्रीनं अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याकडील फुटबॉलच्या विश्वातील एका देदिप्यमान पर्वावर त्यामुळं पडदा पडलाय...रविवार 12 जून, 2005...स्थळ : क्वेट्टा, पाकिस्तान...19 वर्षांच्या त्या खेळाडूला भारतीय प्रशिक्षक सुखविंदर सिंग यांनी तो वरिष्ठ संघाचं प्रतिनिधीत्व करणार असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला आनंदानं अक्षरश: वेड लागण्याची पाळी आली...मग कारकिर्दीतील पहिल्याच लढतीत गोल नोंदवून त्यानं 20 हजार पक्षपाती पाकिस्तान्यांची तोंडं बंद केली. त्यापूर्वी त्यानं ‘सॅफ’ स्पर्धेत भारताच्या 23 वर्षांखालील संघाचं इस्लामाबादेत प्रतिनिधीत्व केलं होतं...त्यानंतर हा प्रवास तब्बल 19 वर्षं, 150 लढती आणि 94 गोल असा चालला..16 मे, 2024...त्या 39 वर्षीय अफलातून भारतीय कर्णधारानं आपला जिवलग मित्र नि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी सखोल चर्चा करून निवृत्त होण्याचा निर्णय समाजमाध्यमांवर जाहीर केला.... भारताच्या त्या अत्यंत अनुभवी फुटबॉलपटूनं मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय गोलांची नोंद केलेली असली, तरी त्याच्या काही फटक्यांना टीकाकार, या खेळातील तज्ञ अजूनही विसरलेले नाहीत...उदाहरणार्थ मैदानावरील प्रतिस्पर्ध्यांना चकवत किरगिज प्रजासत्ताकच्या गोलरक्षकाला दिलेला दणका, केनियाच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून अलगद फटकावलेला चेंडू, म्यानमारविरुद्धची कोंडी फोडणारी ‘स्ट्राईक’ नि ओमानच्या गोलरक्षकाला फसविणारी व रॉकेटच्या गतीनं गेलेली ‘फ्री-कीक’...सुनील छेत्री !

Advertisement

जिगरबाज छेत्री आपल्या जीवनातील शेवटचा सामना खेळणार तो कोलकात्यात कुवेतविरुद्ध...‘फिफा विश्वचषक पात्रता फेरी’तील त्या लढतीत जर भारतानं विजय मिळविला, तर प्रथमच आपला देश तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरेल...त्याच्या निर्णयानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असल्या, तरी त्यात फारसं आश्चर्य मात्र अजिबात लपलेलं नव्हतं. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून सुनील छेत्रीनं निवृत्तीचा निर्णय जाहीर करावा असा मतप्रवाह वाढत चालला होता. त्याची गोल नोंदविण्याची क्षमता आटत चालली होती. त्यानं देशातर्फे शेवटचा मैदानी गोल नोंदविला तो मलेशियाविरुद्ध मागील ऑक्टोबर महिन्यात. त्यानंतर ‘एएफसी एशिया कप’सह सहा आंतरराष्ट्रीय लढतींत त्याला एकही गोल करणं जमलं नव्हतं...छेत्रीच्या मनात निवृत्तीचे विचार बळावू लागले ते अफगाणिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर...

Advertisement

असा हा खेळाडू कोलकात्यातील सॉल्ट लेकवर शेवटची लढत खेळण्यासाठी उतरेल तेव्हा दर्शकांच्या मनात भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील असंख्य प्रसंग जमा होतील...सध्याच्या आणि पुढच्या पिढीतील खेळाडूंसाठी देखील सुनील छेत्रीची जागा भरून काढणं हे आव्हान सोपं जाणार नाहीये. अर्थात संघात असे काही खेळाडू निश्चितच आहेत की, जे कर्णधार म्हणून त्याचा वारसा चालविण्यास सक्षम दिसतात. ही जबाबदारी त्यानं 2011 पासून अभिमानानं पेललीय. तथापि छेत्रीच्या मैदानाबाहेर जाण्यानं सर्वांत मोठी पोकळी निर्माण होईल ती आघाडीफळीत....2005 मध्ये पदार्पण केल्यापासून सुनीलनं क्रिकेटला धर्म मानणाऱ्या या देशात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करताना आघाडीफळीवर अविट छाप सोडली. त्याच्या या स्थानाला आव्हान देणं तो खेळत असताना कुणालाही जमलं नाही. अनेक ‘स्ट्रायकर्स’ आले व गेले, परंतु छेत्री ज्या प्रभावीपणे, ज्या उत्साहानं कार्यरत राहिला तशा पद्धतीनं कुणीही यशस्वी झालं नाही...

असे खेळाडू तयार व्हायला हवेत ते क्लबस्तरावर. पण तिथं नजर टाकल्यास काही फारसं आशादायी चित्र दिसत नाही...मागील काही दशकांपासून प्रमुख क्लब्सनी मुख्य आघाडीपटू म्हणून जबाबदारी सोपविणं पसंत केलंय ते परदेशी खेळाडूंवर. त्यामुळं नवोदित भारतीय आघाडीपटूंवर पाळी आलीय ती दुय्यम भूमिका बजावण्याची किंवा ‘विंगर’ म्हणून खेळण्याची...बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीय आघाडीपटू म्हणून छाप उमटविली होती ती आय. एम. विजयननं. त्यानंतर उगवला तो दिग्गज बायचुंग भूतिया. भूतियानंतर कोण असा प्रश्न निर्माण होईस्तोवर सुनील छेत्रीचा उदय झाला.... छेत्रीचा वारसा कोण चालविणार असा प्रश्न बऱ्याच काळापासून विचारला जातोय. त्यावर खुद्द सुनील म्हणतो, ‘मला भारतीय फुटबॉल संघाच्या भविष्यासंबंधी बऱ्याच आशा आहेत. विविध स्थानांसाठी जोरदार चुरस असली, तरी आघाडीपटूंचा विचार केल्यास माझ्या डोळ्यांसमोर येतात ते लिस्टन कुलासो, मनवीर सिंग, बिपीन सिंग, विक्रम प्रताप सिंह, छांगटे, अनिरुद्ध थापा नि साहाल अब्दुल समदसारखे खेळाडू’....खुद्द छेत्रीची भविष्यात काय भूमिका राहील हा सुद्धा उत्सुकतेचा विषय बनलाय. त्याअनुषंगानं, खास करून प्रशिक्षकपद स्वीकारण्यासंबंधी तो सांगतो, ‘खेळाचं ज्ञान वाढविण्यासाठी प्रशिक्षकपदाचा परवाना मिळविणं मला आवडेल. पण सुंदर दिसणाऱ्या विविध प्रशिक्षकांची अतिताणामुळं केवळ एका वर्षात झालेली परिस्थिती मी पाहिलीय अन् त्यामुळं सध्या तरी प्रशिक्षक व्हायचा विचार नाही’... सुनील छेत्रीकडे विलक्षण चिवट मानसिकता राहिलीय आणि सतत लढण्याचा निर्धारही. त्यानं आपल्या संघासाठी नेहमी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु राष्ट्रीय संघात मुख्य ‘स्ट्रायकर’ म्हणून छेत्रीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी राहिला तो कोणी नवीन खेळाडू नव्हे, तर झपाट्यानं सरणारा वेळ...सुनीलनं निवृत्ती जाहीर केलेली असली, तरी ‘इंडियन सुपर लीग’मध्ये ‘एफसी बेंगळूर’तर्फे खेळताना किमान वर्षभर त्याचं दर्शन घडेल !

थोडक्यात भारताचा दिग्गज कर्णधार...

मिळालेले सन्मान...

अफलातून कारकीर्द...

जिंकलेले चषक...

क्लबस्तरावर वाटचाल...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article