खारुताईला घाबरतात सारे...
खार हा निरुपद्रवी प्राणी आहे. लहान मुलांचा तर तो विषेश आवडता आहे. खारीच्या बहुतेक प्रजाती आकाराने लहान आणि भित्र्या असतात. त्यामुळे थोडीशी धोक्याची चाहूल लागताच खार पळून जाते आणि झाडांच्या पानांमध्ये स्वत:ला लपविते. अशी ही खारुताई कोणाच्या मनात भीती निर्माण करु शकेल, हे कसे शक्य आहे, असा प्रश्न आपल्या मनात येईल. तथापि, असा प्रकार राजस्थानातील उदयपूर शहरात असणाऱ्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात घडत आहे. या महाविद्यालयातील सारे विद्यार्थी-विद्यार्थिनी एका खारीला घाबरतात. प्राध्यपक आणि कर्मचारी यांनाही या खारीची भीती वाटते.
ही खार या महाविद्यालयाच्या परिसरात अचानकपणे कोणावरही हल्ला करते आणि त्याला चावा घेऊन पळून जाते. ती अत्यंत चपळ असल्याने कोणालाही पकडता येत नाही. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने तिला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. वनविभागाच्या तज्ञांनाही बोलाविण्यात आले. तथापि, ती आजपर्यंत कोणाच्याही हाती सापडलेली नाही. तिच्या चाव्यांमुळे अनेक विद्यार्थी बरेच जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर औषधोपचार करावे लागले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना रॅबीज या धोकादायक आजाराची लागणही या खारीमुळे झाली आहे. या खारीने साऱ्यांच्या मनात इतकी भीती निर्माण केली आहे, की विद्यार्थ्यांनी खाली बसणेही सोडून दिले आहे. ती भर वर्गात शिरुन प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांना चावे घेते. त्यामुळे महाविद्यालयाचे प्रशासन चिंतेत आहे, पण कोणत्याही उपाय सापडेनासा झाला आहे. पशुवैद्य तज्ञांच्या मते ही खार पिसाळली आहे. अतिउष्मा, भूक किंवा मेंदूच्या विकारामुळे प्राणी अशा प्रकारे पिसाळू शकतात. त्याला रॅबीज या रोगाची लागण होऊ शकते. असा प्राणी अन्य कोणाला चावला, तर त्यालाही या रोगाचा सांसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खारीवर काही विशेष उपाय करावा लागणार आहे.