सर्व कर्म मला अर्पण केलीस तरी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती पावशील
अध्याय नववा
असमर्थोऽ र्पितुं स्वान्तं एवं मयि नराधिप । अभ्यासेन चे योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ।। 11 ।। ह्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत. त्यानुसार बाप्पांनी राजाला सांगितलं की, माझे ठिकाणी मन अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास आणि योग यांचे योगाने मजकडे येण्याचा प्रयत्न कर. मागील श्लोकात बाप्पांनी सांगितल्यानुसार मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करावी असं जरी भक्ताला मनापासून वाटत असलं तरी मनाची वाऱ्यापेक्षा चंचल वृत्ती आणि बुद्धीची चौखूर धाव माणसाला आवरून धरणं अशक्य होतं. अनेक संकल्पविकल्प करून बुद्धी निरनिराळ्या कल्पना लढवत राहते. त्यामुळे भक्ताच्या मनात असूनसुद्धा मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करण्यास तो असमर्थ ठरतो. भक्ताची ही अडचण बाप्पांनी केव्हाच ओळखली आहे आणि म्हणून ते त्याला सुचवतायत की, अभ्यास आणि योग हे पर्याय आजमावून तर पहा. वारंवार एखाद्या गोष्टीचा सराव करणे याला अभ्यास म्हणतात.
अभ्यास आणि तपश्चर्या म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे श्रीगोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनात समजावून सांगतात. ते म्हणतात, समजा आपण एखाद्या गावाला जायचे ठरवून निघालो पण रस्ता चुकून अडवाटेला गेलो तर आपण काय करतो? रस्ता चुकलाय हे लक्षात आल्याबरोबर आपण परत फिरतो आणि जेथून आपण रस्ता चुकलो होतो तिथपर्यंत परत येऊन मूळ रस्त्याने पुढे चालू लागतो. असं जर केलं नाही तर आपण मुक्कामाला कधीच पोहोचू शकणार नाही. म्हणून हे जे परत फिरून मूळ रस्त्याला येणं आहे ना, यालाच अभ्यास म्हणतात. आपण जितक्या वेळा चुकतो तितक्या वेळा आपण परत फिरणं आवश्यक असतं. तसंच ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करताना आपण भरकटलोय हे लक्षात आलं की, पुन्हा मूळ भक्तिमार्गाने जाण्यासाठी परत फिरण्याचा सराव करणं म्हणजे अभ्यास आणि हे आपल्याला परत परत करावं लागतं, त्याला तपश्चर्या म्हणूयात. अशी ही अभ्यासयुक्त तपश्चर्या जो करेल तो निश्चित मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अभ्यासाच्या जोडीला बाप्पांनी योगसाधना करायला सांगितली आहे त्याविषयी जाणून घेऊयात.
एखादा साधक अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करतो पण बाह्य गोष्टींच्या आकर्षणाने त्याचं अभ्यासावरचं मन उडतं आणि त्याला कालांतराने अभ्यासाचा कंटाळा येऊ लागतो. अशा अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी बाप्पा वरेण्याला योगाचा आश्रय घ्यायला सांगत आहेत. आपल्या शरीरात जे मुख्य पाच वायू आहेत ज्यांना पंचप्राण म्हणतात. त्यापैकी प्राण आणि अपान हे मुख्य आहेत पण त्यांचं एकमेकांशी कधीच पटत नाही. त्यामुळे त्यांचा एकमेकांवर सतत कुरघोडी करायचा प्रयत्न चालू असतो. ज्याला प्राणायाम साधतो अशा प्राणायामपरायण साधकाला प्राण आणि अपान यांच्यात समझोता घडवून आणणे शक्य होतं. त्याचं मन एका ठिकाणी स्थिर होतं. असं स्थिर झालेलं मन ध्यानधारणेच्या माध्यमातून ईश्वरभक्तीत तल्लीन होऊ शकतं. मनाची स्थिरता साध्य करून ईश्वरभक्ती करणारा साधक ईश्वराला अत्यंत प्रिय होतो असं भागवतात सांगितलंय आणि जो ईश्वराला प्रिय होतो त्याला ईश्वरप्राप्ती होतेच होते. हेही ज्याला साध्य होणार नाही त्याला पुढील श्लोकात बाप्पा वरेण्याला सांगतायत की, सर्व कर्मे मला अर्पण कर म्हणजे तुला मोक्षप्राप्ती होईल.
तत्रापि त्वमशक्तश्चेत्कुरु कर्म मदर्पणम् ।
मामनुग्रहतश्चैवं परां निर्वृतिमेष्यसि ।। 12 ।।
अर्थ- मला येऊन मिळण्यासाठी मन आणि बुद्धी मला अर्पण करणे, अभ्यास आणि तपश्चर्या करणे हे ह्या आधी सांगितलेल्या उपायांनी माझ्यापर्यंत येण्यास तू असमर्थ असशील तर सर्व कर्म मला अर्पण कर. माझ्या अनुग्रहाने तू अत्यंत श्रेष्ठ अशी शांती पावशील.
क्रमश: