For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेरा वर्षे उलटली तरी घरकुलाचे स्वप्न अपूर्णच

12:09 PM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
तेरा वर्षे उलटली तरी घरकुलाचे स्वप्न अपूर्णच
Advertisement

बेळगाव दक्षिणमधील नागरिकांचे विधानसौधसमोर धरणे

Advertisement

बेळगाव : वाजपेयी गृहनिर्माण योजनेंतर्गत बेळगाव दक्षिण मतदारसंघात तीनशेहून अधिक कुटुंबांकडून महानगरपालिकेकरवी दीड लाख रुपयांचा निधी जमा करून घेण्यात आला. परंतु, तेरा वर्षे उलटली तरी या नागरिकांना घरकुल अथवा त्यांचे भरलेले पैसेही देण्यात आलेले नाहीत. यामुळे या सर्वसामान्य कुटंबांना राज्य सरकारने घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. सुवर्णविधानसौधसमोर बुधवारी आंदोलन करत दक्षिण मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या. 2012 साली वाजपेयी गृहनिर्माण योजनेसाठी जागृती करण्यात आली होती.  नागरिकांनी आपल्याला घरकुल मिळावे यासाठी महानगरपालिकेकडे पहिल्यांदा 50 हजार व त्यानंतर 66 हजार रुपये जमा केले.

त्याच्या रितसर पावत्या संबंधितांकडे आहेत. पैसे भरूनदेखील या नागरिकांना मागील तेरा वर्षांत घरकुल मिळालेले नाही. याबाबत खासदार, तसेच अनेक लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली. परंतु, त्यांनीही समर्पक उत्तरे दिलेली नाहीत. अनेक गोरगरिबांनी स्वत:चे दागिने विकून व जमिनी विकून त्यावेळी पैसे जमा केले होते. परंतु, त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तसेच दिलेली रक्कमही अद्याप परत मिळालेली नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारला तर लवकरच घरे मिळतील, असे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढत गोरगरिबांना घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनगोळ, वडगाव, झाडशहापूर, मजगाव यासह दक्षिण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.