For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालुक्य एक्स्प्रेसमधील हल्लेखोराचा दहा दिवसांनंतरही सुगावा नाही

10:55 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
चालुक्य एक्स्प्रेसमधील हल्लेखोराचा दहा दिवसांनंतरही सुगावा नाही
Advertisement

सर्वच रेल्वेस्थानकांवरील फुटेज हस्तगत : मात्र तपास शून्यच

Advertisement

बेळगाव : पुदुच्चेरी-दादर चालुक्य एक्स्प्रेसमध्ये झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या खुनाला दहा दिवस उलटले तरी मारेकऱ्याचा शोध लागला नाही. रेल्वे पोलिसांच्या चार पथकांनी तब्बल पाच ते सहा दिवस मुंबई ते पुदुच्चेरीपर्यंतच्या सर्व रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिल्यानंतरही मारेकऱ्याविषयी पुसटशी माहितीही हाती लागली नाही. त्यामुळे मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दि. 16 मे रोजी चालुक्य एक्स्प्रेसमध्ये लोंढा ते खानापूर रेल्वेस्थानकांदरम्यान एका माथेफिरूने धावत्या रेल्वेत चाकूहल्ला केला होता. चाकूहल्ल्यात देवर्षी प्रेमनारायण वर्मा (वय 25) रा. शेसा, जि. झांशी, उत्तरप्रदेश या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अश्रफअली कित्तूर (वय 27) या टीसीसह चौघे जण जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे विभागाचे डीआयजी एस. डी. शरणाप्पा, पोलीसप्रमुख सौम्यलता एस. के. आदी अधिकाऱ्यांनी बेळगावला धाव घेतली होती.

रेल्वे पोलिसांची चार पथके तपासकामात लागली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मुंबईपासून पुदुच्चेरीपर्यंतच्या प्रत्येक रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पाहणी करण्यात आली आहे. फुटेज तपासल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. विशेष पथके कामाला लागण्याआधीच हुबळी रेल्वेस्थानकावर संशयिताची छबी सीसीटीव्हीत कैद झाली होती. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसला नाही. त्यामुळे तपास अधिकारीही चक्रावून गेले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील पोलूर रेल्वेस्थानकावर सीसी कॅमेरे नाहीत. पोलूर वगळता इतर सर्व रेल्वेस्थानकांवरील फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही रेल्वेस्थानकावरून उतरताना किंवा चढताना मारेकऱ्याची छबी कैद झाली नाही. त्यामुळे तामिळनाडूतील पोलूरमधून मारेकरी रेल्वेत चढला असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई व पुदुच्चेरीला गेलेली पथके बेळगावला परतली आहेत. खानापूर, लोंढा, गुंजी परिसरात मात्र दहा दिवसांनंतरही गावोगावी जाऊन पोलिसांची तपासणी मोहीम सुरूच आहे. कारण, खानापूरजवळून धावत्या रेल्वेतून उडी टाकणारा मारेकरी जखमी झाला असणार, या संशयाने त्याचा शोध घेण्यात येत असून दहा दिवसांनंतरही मारेकऱ्याचा शोध लागला नाही. त्यामुळे तपास यंत्रणेसमोरील गुंता वाढला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.