मंत्रिमंडळ समित्यांची केंद्राकडून स्थापना
सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय समित्यांचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून बुधवारी अनेक मंत्रिमंडळ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यात सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय समित्यांचा समावेश आहे. सुरक्षा समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर या सदस्यांचा समावेश आहे.
आर्थिक समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, एस. जयशंकर, नितीन गडकरी, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि निजदचे एच. डी. कुमारस्वामी यांचा समावेश आहे. याशिवाय या समितीत पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, शिवराजसिंग चौहान आणि संयुक्त जनता दलाचे लालनसिंग यांचा समावेश आहे. संसदीय व्यवहार समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर सर्व महत्वाच्या विभागांचे कॅबिनेट मंत्री, तसेच तेलगु देशमचे नेते नागरी विमानवाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सी. आर. पाटील, जुआल ओराम आणि वीरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल (स्वतंत्र पदभार) आणि कायदा राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा समावेश विशेष आमंत्रित म्हणून करण्यात आला आहे. या समित्यांच्या स्थापनेमुळे आता केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारसमोर आलेल्या कोणत्याही प्रस्तावाला या समित्यांची प्रथम मान्यता मिळणे आवश्यक असते, असा संसदीय नियम आहे.