सुरक्षेच्या कारणास्तव भुईकोट किल्ल्यात प्रवेशबंदी
रेड अलर्टमुळे शहरातील सुरक्षा वाढविली
बेळगाव : भारतीय सैन्याने बुधवारी एअर स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त काश्मीर, तसेच इतर परिसरात हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील लष्करीतळांचे संरक्षण वाढविण्यात आले आहे. बेळगावच्या भुईकोट किल्ल्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी असलेली कार्यालये, तसेच आश्रमामध्ये जाण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. याचा वचपा काढण्यासाठी बुधवारी भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. देशातील महत्त्वाची शहरे, तसेच ठिकाणांना रेड अलर्ट देण्यात आल्याने सुरक्षा वाढविण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरात मराठा लाईट इन्फंट्रीचे रेजिमेंटल सेंटर, एअरमन ट्रेनिंग स्कूल, हवाईतळ, विमानतळ, महार रेजिमेंट यांचे कार्यालय असल्यामुळे शहरातील एकूण सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
बेळगावच्या भुईकोट किल्ला येथे बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून प्रवेशबंदी करण्यात आली. वाहनांसह नागरिकांना रस्ता बंद करण्यात आला. भुईकोट किल्ल्यामध्ये महार रेजिमेंटच्या कार्यालयासोबत ऐतिहासिक कमल बस्ती, दुर्गादेवी मंदिर, रामकृष्ण मिशन आश्रम, दर्गा, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली. किल्ल्यामधून जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. सरकारी कार्यालये, तसेच आश्रमामध्ये कामानिमित्ताने जाणाऱ्या नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. आधारकार्ड, तसेच इतर एखादे ओळखपत्र दिल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे. तसेच त्या व्यक्तीची नोंद करून घेतली जात आहे. किल्ल्याच्या अंतर्गत राहणाऱ्या रहिवाशांना कागदपत्रांची पूर्तता करून सोडले जात आहे.