For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरगावात मंगळवारी दुपारनंतर प्रवेशबंदी

12:50 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
शिरगावात मंगळवारी दुपारनंतर प्रवेशबंदी
Advertisement

चौगुले, महाजन व सेवेकरीच राहणार मंदिरात : श्रीलईराई देवस्थान समितीचा महत्वपूर्ण निर्णय ,आज सायंकाळपर्यंत जवळची सर्व दुकाने हटविणार 

Advertisement

डिचोली : शनिवारी पहाटे शिरगाव येथे देवीच्या अग्निदिव्य मार्गक्रमणावेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारानंतर श्रीदेवी लईराई देवस्थान समितीने काही कठोर व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंगळ दि. 6 मे रोजी जत्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दुपारनंतर मंदिरात व मंडपात बाहेरील लोकांना व भाविकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मंदिरात केवळ चौगुले मानकरी, महाजन व सेवेकरी इतकेच लोक त्या ठिकाणी असतील. त्याचप्रमाणे आज सोम. दि. 5 मे रोजी संध्याकाळपर्यंत शिरगावातील धोंडांची तळी ते मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थाटलेली सर्व दुकाने हटविण्याची सूचना देवस्थान समिती करणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी दिली. शिरगाव येथे जत्रोत्सवाच्या दिवशी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचे दु:ख संपूर्ण देवस्थान समितीला व गावातील लोकांनाही आहे.

या घटनेमुळे गावात जत्रोत्सवाच्या उत्साहाबरोबरच दुखवटाही आहे. जत्रोत्सवात होणारी गर्दी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देवस्थान समिती व प्रशासन संयुक्तपणे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत आहेत. तरीही दरवषी जत्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी देवीचा कळस मंदिरात जाताना मंदिरात सभामंडपात तसेच शिरगावातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. या गर्दीवरही नियंत्रण ठेवणे आटोक्मयात नसते. यासाठी अखेरच्या दिवशी दुपारनंतर मंदिरात भाविकांना प्रवेशबंदी राहणार. कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. केवळ कळसासोबत असलेले चौगुले मानकरी, देवीचे महाजन व सेवेकरी हेच मंदिरात असतील. याची गोवाभरातील देवीच्या भाविक भक्तजणांनी नोंद घ्यावी, असे गावकर म्हणाले. हा निर्णय घेत असताना आम्हालाही दु:ख होत आहे. परंतु जत्रोत्सवात किंवा कौलोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेची काळजी ठेवणे ही आमची कर्तव्यपूर्ण जबाबदारी असल्याने असा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेतला गेला आहे.

Advertisement

आज संध्याकाळपर्यंत दुकाने हटवणार

शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेमुळे सहा जणांचे जीव गेले. त्यामुळे हा प्रकार अत्यंत शोकाकुल असल्याने या उत्सवात धोंडगणांची तळी ते मंदिर यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा थाटण्यात आलेली सर्व दुकाने हटविण्याची सूचना देवस्थान समितीने केली आहे. या संदर्भात एक निवेदन डिचोलीच्या मामलेदारांनाही सादर केले असून सर्व दुकानदारांनी आपली दुकाने सोमवारी संध्याकाळपर्यंत आपल्या जागेवरून हटवावी. असे त्यांना आव्हान करण्यात आले आहे. जर कोणीही आपले दुकान हटवत नसल्यास पोलीस बळ वापरून त्यांची दुकाने हटवण्यात येणार आहे. याही आदेशाचे सर्व दुकानदारांनी पालन करून समितीला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केले आहे.

कौलोत्सवासाठी गर्दी करू नका !

सध्या शिरगावात देवीचा कौलोत्सव सुरू आहे. घडलेल्या घटनेनंतर गावात होणारी गर्दी पाहिल्यास लोकांनीही आपला स्वत:चा जीव धोक्मयात न घालता कौलोत्सवास गर्दी करू नये. देवीच्या कौलोत्सवासाठी दरवषी भाविक दूर दूरवरून येत असतात. या भाविकांना कौलोत्सवास येण्यास मज्जाव करणे हे आम्हालाही पटत नाही. परंतु सध्याची परिस्थिती संवेदनशील असल्याने अशी विनंती करणे देवस्थान समितीलाही भाग पडत आहे. याही विनंतीला भाविक भक्तजनांनी मान देत कौलोत्सवास उपस्थित राहू नये, असे आवाहनही देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी यावेळी केले. जत्रोत्सवाच्या पुढील दोन दिवसांमध्ये कोणत्या उपाययोजना व खबरदारी हाती घ्यावी या संदर्भात देवस्थान समिती तसेच डिचोलीचे मामलेदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस उपधीक्षक, निरीक्षक यांची एक महत्वपूर्ण बैठक काल रविवारी दि. 4 मे रोजी संध्याकाळी देवस्थान समितीच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीनंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी बैठकीत घेण्यात आलेले सर्व निर्णय जाहीर केले.

Advertisement
Tags :

.