युद्धजन्य स्थितीमुळे सेन्सेक्स-निफ्टी घसरणीत
निफ्टी 24008 वर बंद : टायटनचे समभाग 4 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. अंतिम सत्रात सेन्सेक्स 800 पेक्षा अधिक तर निफ्टी 265 हून अधिकच्या अंकांनी प्रभावीत झाले होते. बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानसोबतच्या अलीकडील घडामोडींचा परिणाम आज शेअर बाजारात दिसून येऊ शकतो आणि सेन्सेक्स आणि निफ्टी-50 मध्ये मोठी घसरण होऊ शकते.
बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी 1300 अंकांपेक्षा जास्त घसरून 78,968.34 वर उघडला. ही दिवसाची सर्वात कमी पातळी आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 880.34 अंकांनी घसरुन निर्देशांक 1.10 टक्क्यांनी घसरून 79,454.47 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील अखेर 265.80 अंकांनी घसरून 24,008 वर बंद झाला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे, कमकुवत बाजारातही टायटनचे शेअर्स 4 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले. याशिवाय, टाटा मोटर्स, एल अँड टी, एसबीआय आणि एशियन पेंट्सचे समभाग वाढले.
स्वतंत्र बाजार विश्लेषक अंबरिश बालिगा म्हणाले, ‘बाजारात मोठी घसरण होऊ शकते, परंतु सध्या कमी सर्किट येण्याची शक्यता नाही. जर पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला तर निफ्टी 500 अंकांपेक्षा जास्त घसरू शकतो. सेन्सेक्स सुमारे 2500 ते 3000 अंकांनी घसरू शकतो. तथापि, जर सरकारकडून परिस्थितीबद्दल अधिकृत विधान आले तर ते गुंतवणूकदारांचे मनोबल वाढवू शकते.’ अल्फॅनिटी फिनटेकचे सह-संस्थापक आणि संचालक यू. आर. भट म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये पुढे काय होईल, हे काहीही सांगता येत नाही. ही अनिश्चितता शेअर बाजारातील चिंता वाढवत आहे. पुढे काय होईल यावर गुंतवणूकदार लक्ष ठेऊन आहेत.