For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्ञाननिष्ठा

06:23 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्ञाननिष्ठा
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

सदैव निरपेक्षतेनं भक्ती करणाऱ्यांना बाप्पांच्याकडून मोक्षरूपी फळ मिळतंच पण इतर भक्तांच्याकडेही बाप्पा दुर्लक्ष करत नाहीत. मनात जी इच्छा धरून जो भक्ती करत असेल त्याला बाप्पा फळ देतात. बाप्पा भक्तीचे भुकेले आहेत. बाप्पा स्वत: परिपूर्ण असल्याने, इतरांना कितीही दिलं तरी त्यांच्याकडच्या उपलब्धतेतलं काहीच कमी होत नाही. जे सकाम भक्ती करतात त्यांच्या अपेक्षा बाप्पा पुरवतात. ते हे समजून असतात की, भक्तीच्या बदल्यात मिळणारी वस्तू कायम टिकणारी नसल्याने अशा वस्तू मागण्यात काही अर्थ नाही. ही बाब भक्ताच्या लक्षात आली की, भक्ती करण्याचे मूळ उद्दिष्ट त्याच्या लक्षात येते आणि तो मुक्ती मिळण्यासाठी भक्ती करू लागतो. बाप्पा मुक्ती मिळावी या अपेक्षेने भक्ती करणाऱ्या मुमुक्षुना मार्ग दाखवतात. दु:खी, कष्टी, व्याकुळ, आर्त असे भक्त बाप्पाना शरण जाऊन आधीव्याधीतून मुक्त करा अशी प्रार्थना करतात. त्यांचे दु:ख बाप्पा निवारण करतात. साधू, संन्यासी, साधक इत्यादींना मोक्ष देतात. वरील सर्व प्रकारचे भक्त बाप्पाना प्रिय असतात. भक्ती करणाऱ्याची जशी भावना असते त्याप्रमाणे बाप्पा त्याला फळ देतात.

ह्यातील लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, सदैव ईश्वर चिंतनात मग्न असलेल्या भक्ताची मानसिकता इतरांच्यापेक्षा वेगळी असते. जीवनात अपेक्षा करून त्या पूर्ण होण्यासाठी धडपडण्यापेक्षा जे आपलं आहे ते आपल्याला काहीही झालं तरी मिळणारच आहे अशी त्याची खात्री असते. त्यामुळे तो स्वस्थचित्त असतो. त्याला सुख, दु:ख, इच्छा, द्वेष इत्यादि विकार बाधत नाहीत. जीवनात माणूस ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्या सर्व नाशवंत आहेत हे त्याच्या लक्षात आलेलं असल्याने तो असा विचार करतो की, जरी समजा त्या मिळाल्या तरी त्यांचं महत्व तात्पुरतंच आहे मग त्यांची अपेक्षा करा कशाला? ह्या विचारसरणीला ज्ञाननिष्ठा असं म्हणतात. असे ज्ञाननिष्ठ साधक अध्यात्मातली तत्वे जीवनात अंमलात आणतात. त्यामुळे ते समाधानी असल्याने शेवटी ईश्वरात विलीन होतात. अर्थातच ही फार उच्च कोटीची मनोवृत्ती झाली. ती तशी तयार होण्यापूर्वीही लोक बाप्पाची भक्ती करत असतात. असे भक्तही बाप्पाना आवडतात. त्यांच्याही इच्छा बाप्पा पुरवतात. एकूण काय भक्त कसाही असो, तो कुणाची ना कुणाची भक्ती करतोय ना, मग तो हळूहळू का होईना योग्य मार्गाला लागणारच अशी बाप्पाना खात्री असते. पुढील श्लोकात योग्य मार्ग म्हणजे नक्की काय ते बाप्पा सांगतायत.

Advertisement

जना स्युरितरे राजन्मम मार्गानुयायिन ।

तथैव व्यवहारं ते स्वेषु चान्येषु कुर्वते ।। 16 ।।

अर्थ- हे राजा, मनुष्य माझ्या मार्गाने वागणारा असो, वा अन्य मार्गाने जाणारा असो मी सर्वांशी एकाच प्रकारचा व्यवहार करतो.

विवरण- बाप्पा त्यांच्या भक्तांवर सारखंच प्रेम करत असतात. काही भक्तमंडळींना केलेल्या कर्माचं फळ हवं असतं तर काही भक्त फळाची अपेक्षा न करता कर्मयोगाच्या माध्यमातून बाप्पांची आराधना करून मोक्ष मिळवू इच्छित असतात. अर्थातच फळाची अपेक्षा व मोक्ष ही भिन्न उद्दिष्टे असल्याने भक्ताला त्यापैकी एकाची निवड करावी लागते. यापैकी जे मोक्षाची निवड करून फळ सोडायला तयार असतात ते योग्य मार्गावर असतात पण म्हणून फळाची अपेक्षा करून जे भक्ती करतात त्यांना बाप्पा नाराज करत नाहीत. ते फळाच्या रूपात पुढे उभे ठाकतात. योग्य मार्गावर असलेले भक्त लोकव्यवहार पाळत असतात आणि कर्तव्य पार पडलं की, अलगद बाजूला होतात. कुटुंबाबाबतही त्यांचं वर्तन तसंच असतं. त्यामुळे तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे अशी जबरदस्ती ते कुणावर करत नाहीत. कुटुंबाबाबतची सर्व कर्तव्ये पार पाडतात आणि स्वस्थ राहतात कारण कर्तेकरविते ईश्वर आहेत हे ते जाणून असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.