इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा मालिकाविजय
वृत्तसंस्था/ मुंबई
ईसी वाँगच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड अ महिला क्रिकेट संघाने यजमान भारताविरुद्धची 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील रविवारी झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडने भारताचा 2 गड्यांनी पराभव केला.
हा शेवटचा निर्णायक सामना थरारक झाला. दोन्ही संघांकडून अधिक धावा होऊ शकल्या नाहीत. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला अ संघाचा डाव 19.2 षटकात 101 धावात आटोपला त्यानंतर इंग्लंड अ संघाने 19.1 षटकात 8 बाद 104 धावा जमवित विजयासह मालिका हस्तगत केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत अ महिला क्रिकेट संघाला भक्कम फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 19.2 षटकात 101 धावात आटोपला. भारतीय फलंदाज धावा जमविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. भारताच्या डावामध्ये वृंदा दिनेशने 16 चेंडूत 9 धावा जमविल्या. जी. त्रिशाने 10 चेंडूत 7 धावा जमविल्या. उमा छेत्रीने 16 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. उमाला 14 धावावर असताना जीवदान मिळाले होते पण त्याचा लाभ तिला घेता आला नाही. गोयलने 5 धावा जमविल्या. भारताची यावेळी स्थिती 14 षटकात 5 बाद 65 अशी होती. कनिका आहुजाने 3, दिशा कसाटने 25 चेंडूत 1 षटकारासह 20 धावा जमविल्या. मोनिका पटेलने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. इंग्लंड अ संघातर्फे ईसी वाँग, गॉर्डन, विलियर्स आणि लॉरेन फिलेर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये ग्रेस स्क्रिव्हेन्सने 10 धावा जमविल्या. केंपला आपले खाते उघडता आले नाहीत. मॅडी विलेर्सने 1 धाव जमवली. पहिल्या 4 षटकात इंग्लंडची स्थिती 3 बाद 28 अशी होती. भारताच्या मणीने 24 धावात 2 गडी बाद केले. अमितेजने 28 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या आणि ती एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाली. अनुशाने इंग्लंडच्या स्मेलीला 18 धावावर बाद केले. इंग्लंडने यावेळी 6 बाद 63 धावा जमविल्या होत्या. ईसी वाँग आणि साऊथबाय यांनी संघाला विजयाच्या दिशेने नेले. साऊथबाय 3 धावावर बाद झाली. इंग्लंडच्या डावातील 16 व्या षटकात श्रेयांका पाटीलने इंग्लंडचे 2 फलंदाज बाद केले. तिने लॉरेन फिलेरला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत केले. पण शेवटी ईसी वाँगने विजयी धावा घेत भारताचे मालिकेतील आव्हान संपुष्टात आणले. ईसीने नाबाद 28 धावांचे योगदान दिले. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ईसी वाँगने 15 चेंडूत नाबाद 35 धावा जमवित आपल्या संघाला बरोबरी साधून दिली होती. या मालिकेतील पहिला सामना भारत अ संघाने जिंकून आघाडी मिळविली होती.
संक्षिप्त धावफलक : भारत अ 19.2 षटकात सर्व बाद 101 (उमा छेत्री 21, दिशा कसाट 20, वृंदा दिनेश 9, गोयल 5, आहुजा 3, वाँग, गॉर्डन, विलियर्स आणि फिलेर प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड अ 19.4 षटकात 8 बाद 104 (होली अर्मिटेझ 27, ईसी वाँग नाबाद 28, स्मेली 18, श्रेयांका पाटील, मिन्नू मणी प्रत्येकी 2 बळी).