तेलंगणातील मुस्लीम आरक्षण समाप्त करू
भाजप तेलंगणातील मुस्लीम समुदायाला देण्यात आलेले 4 टक्के आरक्षण संपुष्टात आणणार असून ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागास वर्गादरम्यान विभागण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित पेले आहे. राज्यात भाजप सत्तेवर आल्यास धर्म आधारित आरक्षण संपुष्टात आणत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण वाढविण्यात येऊन त्यांच्या हितांचे रक्षण करण्यात येणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
तेलंगणात मदिगा समुदायाला अनुसूचित जातीच्या अंतर्गत आरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील घोटाळेबाज आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या केसीआर यांच्या बीआरएसला सत्तेतून हाकलण्याचे आवाहन शाह यांनी जनतेला केले आहे.
भाजप सत्तेवर आल्यास केसीआर सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करत भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल. केसीआर यांच्या आमदारांनी भूखंड हडप करण्याशिवाय कुठलेच काम केलेले नाही. भाजपचे सरकार आल्यास दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती दिन हाच राज्योत्सवाच्या स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. तसेच तेलंगणात सामाजिक न्याय निश्चित करण्यासाठी भाजप मागास वर्गाशी संबंधित नेत्याला मुख्यमंत्री करणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी हळद महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करत उत्तर तेलंगणाच्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढला आहे. तर केसीआर सरकारच्या काळात मिशन भगिरथ घोटाळा, पासपोर्ट घोटाळा, मियापूर भूमी व्यवहार घोटाळा, आउटरिंग घोटाळा, कालेश्वर प्रकल्पात 40 हजार कोटीचा घोटाळा, मद्य घोटाळा झाला असल्याचा आरोप शाह यांनी केला.
राज्यात घराणेशाहीचे राजकारण
केसीआर यांचा पक्ष, असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही घराणेशाहीयुक्त आहेत. हे तिन्ही पक्ष 2जी, 3जी आणि 4जी पक्ष आहेत. 2 जीचा अर्थ केसीआर आणि केटीआर, 3 जीचा अर्थ ओवैसी यांचा पक्ष तर 4 जीचा अर्थ जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष असा होतो. याउलट भाजप हा जनतेचा पक्ष आहे. केसीआर यांच्या पक्षाचे चिन्ह कार आहे, परंतु या कारचे स्टेअरिंग केसीआर, यांच्याकडे नाही, तर ओवैसी यांच्या हातात असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.