जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक
बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान : किश्तवाडमध्ये दोन जवान हुतात्मा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी दोन ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली. बारामुल्लामध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. तर, शुक्रवारी रात्री किश्तवाडमध्ये दोन जवान हुतात्मा झाले होते. तसेच अन्य दोघे जवान जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे.
किश्तवाडच्या चत्रू पट्ट्यातील नैदघम गावात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता चकमक सुरू झाली. जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांच्या घुसखोरीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग या दोघांना हौतात्म्य पत्करावे लागले.
बारामुल्ला जिह्यातील व्रेरी येथील चक टापर भागात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली. शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शस्त्रे जप्त
या दोन चकमकींपूर्वी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराने मोठी कारवाई केली होती. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.