पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी मानधनापासून वंचित
सहा महिने नाही मानधन ; १ जूनपासून आंदोलनाचा इशारा
कुडाळ / वार्ताहर
गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता विभाग) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने १ जूनपासून महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील या विभागातील कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेल्या गट संसाधन केंद्रामध्ये गट समन्वयक व समूह समन्वयक अशी दोन पदे असून संबंधित कर्मचारी गेली १३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत आहेत. मात्र डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे संघटनेने सांगितले. जिल्हा परिषद ( सिंधुदुर्ग ) उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) श्री . सावंत यांना संघटनेच्यावतीने जिल्हा अध्यक्ष अर्जुन गवस व सुभाष नाईक ( दोडामार्ग ) यांनी निवेदन सादर केले.मानधन रखडल्यामुळे कुटुंबाचा दैनंदिन खर्च, प्रवास खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी तसेच इतर जबाबदाऱ्यांचा ताळमेळ बसविणे कठीण झाले असून कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक अवस्था बिकट झाली असल्याचे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री गवस यांनी सांगितले. सुभाष नाईक यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.आंदोलनाच्या रूपरेषेबाबत माहिती देताना अर्जुन गवस व सचिव समिल नाईक यांनी सांगितले की, १ जून ते ५ जून दरम्यान जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ८ जून रोजी राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.याशिवाय ९ जूनपासून मानधन मिळेपर्यंत जिल्हास्तरावर कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.