विमान प्रवास दर वाजवी करण्यावर भर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विमान प्रवासाचे दर सर्वसामान्यांना परवडण्यासारखे करण्यावर आपला भर असेल, असे प्रतिपादन नूतन प्रवासी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी केले आहे. नायडू हे तेलगु देशम पक्षाचे असून त्यांच्यावर नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नागरी विमानवाहतूक विभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना आणि इतर परिस्थितीमुळे विमानांच्या प्रवासी भाड्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. आता परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे मी प्रवासी भाडे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रवासी विमान वाहतूक व्यवसायाचा विस्तार होण्यासाठी दर वाजवी असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हवाई चप्पल से हवाई जहाज तक’ असे धोरण निर्धारित पेले आहे. ते प्रत्यक्षात यायचे असेल तर प्रवासी भाड्याचे दर कमी होणे आवश्यक आहे. ते कसे कमी करता येतील, हे विचाराअंती ठरेल. त्यासाठी विमान कंपन्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. विमानप्रवास क्षेत्रात पायाभूत सुविधा विकासाकडे मी गांभीर्याने लक्ष देणार आहे. या क्षेत्रात भारताचे स्थान जगात प्रथम क्रमांकाचे असले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी सुयोग्य धोरण आणि गुंतवणूक यांची आवश्यकता असून त्यासाठी या क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहे. माझ्यावर कमी वयात या विभागाचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले असून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी शक्य तितके सर्व प्रयत्न मी करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.