नव्या आर्थिक वर्षारंभी वीजदरवाढ?
केईआरसीकडून अंतिम टप्प्यातील चर्चा : उद्यापासून नवे दर लागू होण्याची शक्यता
बेंगळूर : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक वीज नियंत्रण आयोग (केईआरसी) 1 एप्रिलपासून नवे वीजदर लागू करण्यासंदर्भात अंतिम टप्प्यातील चर्चा करत आहे. त्यामुळे दरवाढीबाबत कोणता निर्णय होईल, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे. बेंगळूर विभागात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्कॉमसह राज्यातील विविध वीजपुरवठा कंपन्यांच्या (एस्कॉम)च्या प्रस्तावानुसार वीज दरात प्रति युनिट 40 ते 50 पैसे वाढ होण्याची शक्यता आहे. तोट्यात असणाऱ्या वीजपुरवठा कंपन्यांची महसुली तूट भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे केईआरसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
वीज दरवाढ झाली तर कोणावर परिणाम?
जर वीज दरवाढ झाली तर घरगुती 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरकर्ते असणारे ग्राहक, कमर्शियल ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्र या तिन्ही श्रेणीतील ग्राहकांवर थेट परिणाम होईल. गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरकर्ते असणाऱ्या ग्राहकांची बिले सरकार भरेल. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांवर थेट परिणाम होणार नाही. परंतु, 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरली तर त्याचे बिल भरावे लागणार आहे. दरवाढीबाबत मागील महिन्यातच राज्यातील वीजपुरवठा कंपन्यांनी केईआरसीकडे वीज दरवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावानुसार किती प्रमाणात वीजदर वाढविता येईल, याबाबत अधिकाऱ्यांकडून चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
बेंगळूरवासियांना पाणीपट्टीवाढीचाही फटका
बेंगळूरवासियांना 1 एप्रिलपासून पाणीपट्टीवाढीचाही फटका बसणार आहे. बेंगळूरमध्ये पाणीपट्टीत 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. पाणीपुरवठा खर्चात वाढ, व्यवस्थापन खर्च व पायाभूत सुविधांच्या खर्चात वाढ झाल्याने जल मंडळावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी पाणीपट्टीत 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याचाच भाग म्हणून नव्या आर्थिक वर्षात त्याची अंमलबजावणी केली जात आहे, असे बेंगळूर पाणीपुरवठा मंडळाचे अध्यक्ष रामप्रसाद मनोहर यांनी सांगितले.