ग्रामीण भागात झाडे पडून वीजपुरवठा खंडित : नागरिकांची गैरसोय
खानापूर : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित होत आहे. आणि वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. वनखाते आणि हेस्कॉम खात्याने याबाबत तातडीने उपाययोजना करुन रस्ता वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.तालुक्यातील करंजाळ, हलसाळ रस्त्यावर, अनमोड रस्त्यावर, जळगा, हलशी, नागरगाळी, जांबोटी, खानापूरसह इतर गावातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा दोन-दोन दिवस खंडित होत आहे.
वनखाते आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करत असले तरी संपूर्ण रस्ता खुला करणे गरजेचे आहे. खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने भीमगड अभयारण्यात जागोजागी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाडे कोसळल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. भीमगड अभयारण्य विभागाचे वनाधिकारी महेश मरेन्नावर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर पडलेली सर्व झाडे बाजूला करून वाहतुकीसाठी रस्ता खुला केला आहे. तालुक्यात सर्वच रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने तसेच सोसाट्याच्या जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशानीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.