शेतकरी संघटनांनी आवाज उठविताच वीज जोडणी
खादरवाडी येथील शेतकऱ्यांना दिलासा : नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन
बेळगाव : खादरवाडी येथील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी त्या संबंधित शेतकऱ्यांना पोलीस स्थानकात नेण्यात आले होते. त्यानंतर त्या विरोधात शेतकरी संघटनांनी जोरदार आवाज उठविला. यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी चूक मान्य करत त्या शेतकऱ्यांची पुन्हा वीज जोडणी केली आहे. यावेळी संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. चार दिवसांपूर्वी अचानकपणे हेस्कॉमच्या एका पथकाने खादरवाडी येथील मल्लाप्पा पाटील, परशराम पाटील, यल्लाप्पा पाटील या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले. यावेळी शेतकऱ्यांनी विरोध केला. आम्ही रितसर परवानगी घेतली आहे. सध्या मिरची तसेच इतर पिके शेतात आहेत. त्यांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. मात्र वीज कनेक्शन तोडल्यामुळे पाण्याअभावी पिके सुकून जातील. तेव्हा त्याचा विचार करा, अशी विनवणी केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकताच वीज तोडली.
तक्रार करताच वीज जोडणी
यावेळी शेतकऱ्यांनीही त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना बळजबरीने वाहनांतून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणून ताटकळत ठेवले. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्या विरोधात जोरदार आवाज उठविला. शेतकरी संघटनेचे नेते आप्पासाहेब देसाई यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पुन्हा केली. तसेच शेतकऱ्याचे झालेले नुकसान देखील देण्याचे आश्वासन दिले आहे.