दोन-तीन महिन्यांत तालुका, जिल्हा पंचायतींसाठी निवडणुका
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांची माहिती
बेंगळूर : दोन किंवा तीन महिन्यांत राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींसाठी निवडणुका घेण्यात येतील. निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. त्याचप्रमाणे आठ महिन्यांनंतर ग्राम पंचायतींसाठी देखील निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिली. हुबळीतील काँग्रेस कार्यालयाला मंगळवारी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुढील दोन-तीन महिन्यांत जिल्हा पंचायत व तालुका पंचायतींसाठी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे येत्या आठ महिन्यांत ग्राम पंचायत आणि नगरपालिकांसाठी निवडणुका घेण्याची तयारी केली जात आहे. मागील सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्याविषयी बराच गोंधळ निर्माण केला होता. हा मुद्दा न्यायालयातही पोहोचला होता. ही समस्या सरकारने सोडविली आहे. आता निवडणुका घेण्यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे, हा काँग्रेसचा सिद्धांत असल्याचे ते म्हणाले.