स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लवकरच निवडणुका
नगरप्रशासन मंत्री रहिम खान यांची माहिती
बेळगाव : कार्यकाळ पूर्ण होऊन महिन्याचा कालावधी लोटलेल्या राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लवकरच निवडणुका घेतल्या जातील. यामध्ये नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका यांचा समावेश आहे. काही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा तर काही नगरपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आरक्षण, मतदारसंघांचे पुनर्परिसीमन आणि इतर कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडत आहेत. काही दिवसांत सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती नगरप्रशासन मंत्री रहिम खान यांनी दिली.
भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रतापसिंह नायक यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री रहिम खान यांनी उत्तर दिले. राज्यात बहुतांश नगरपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायतींचा कालावधी पूर्ण होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप निवडणुका हाती झालेल्या नाहीत. सरकारी पातळीवर निवडणुका तर सोडा चर्चादेखील होताना दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपल्याने अनुदान मिळानासे झाले असून लोकशाहीची मूल्ये दुर्बल होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे का? असा प्रश्न प्रतापसिंह नायक यांनी उपस्थित केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला तरी निवडणुका घेण्याकडे राज्य सरकार कानाडोळा करत आहे. हा सर्वात महत्त्वाचा विषय असूनही याकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. तर यावर सत्ताधारी आमदारांनी आरोप करत तुमच्या कार्यकाळातही असाच प्रकार सुरू होता. त्यावेळी तुम्ही तातडीने का निवडणुका घेतल्या नाहीत? असा प्रतिप्रश्न केला. यामुळे आरोप-प्रत्यारोप झाल्याने सभागृहात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.
यावर मंत्री खान म्हणाले, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा वाढविला आहे. संस्थांच्या मतदारसंघांचे पुनर्परिसीमन शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्य सरकारने अंतर्गत आरक्षण जाहीर केले असून आरक्षण, पुनर्परिसीमन व इतर बाबी लवकर पूर्ण करण्यात येतील. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी व नवनिर्वाचित स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक नियुक्त केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ता. पं.- जि. पं.निवडणुकांबाबत सरकारची ठाम भूमिका : भैरती सुरेश
यापूर्वी सत्तेवर असलेल्या भाजपने निवडणुका न घेता केवळ वाया घालवला. मात्र, आता याच मुद्द्यावर आवाज उठवत आहे. मात्र काँग्रेस सत्तेवर आल्यापासून अवघ्या दोन वर्षांतच तालुका पंचायत व जिल्हा पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा ठाम निर्णय घेतला. या दृष्टीने पावले उचलण्यात येत असून लवकरच निवडणुका घेण्यात येतील, अशी माहिती नगरप्रशासन मंत्री भैरती सुरेश यांनी प्रश्नोत्तर तासात विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षाने राज्य सरकारवर निवडणुका लांबणीवर टाकत असल्याचा आरोप केला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही याला प्रत्युत्तर देत तुमच्या काळापासूनच निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. तुम्ही सत्तेवर असताना निवडणुका का घेतल्या नाहीत. त्यावेळी तुमच्यात हिंमत नव्हती का?, अशा शब्दात ताशेरे ओढल.