भाजपकडून पुन्हा भावनिक मुद्द्यावरच निवडणूक
तेजस्वीनी गौड यांचा पत्रकार परिषदेत आरोप
बेळगाव : मोदींची गॅरंटी म्हणणाऱ्या भाजप पक्षाकडून आता पुन्हा जनतेच्या भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढविली जात आहे. तर राज्यातील जनतेला दुष्काळ भरपाई निधी देण्यात सरकारला न्यायालयात जावे लागले. राज्यातील 25 खासदारांनी याबाबत का तोंड उघडले नाही? असा प्रश्न माजी विधान परिषद सदस्या तेजस्वीनी गौड यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विकासाचे राजकारण म्हणून डांगोरा पिटणाऱ्या भाजपकडून पुन्हा जातीचे राजकारण केले जात आहे. भाजपचा हा हिडन अजेंडा आहे. जातीयवादी व नागरिकांच्या भावनात्मक मुद्द्यांवर भाजपकडून निवडणूक लढविली जात आहे. पुन्हा जाती-जातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप तेजस्वीनी गौड यांनी केला.
भाजपने महिला कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले
भाजपमध्ये प्रभारी महिला कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जाते. आपल्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी उपस्थित होते.