Political News : यड्रावरकरांना शह देण्यासाठी विरोधक एकवटले?, 'या' मातब्बरांनी कसली कंबर
आगामी निवडणुकीत तिकीट वाटप करताना यड्रावकरांना डोकेदुखी ठरणार?
By : अजित मांगूरकर
कोल्हापूर : निवडणुकांचे निर्देश जाहीर होताच वातावरण गरम होऊ लागले आहे. सर्वांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधक आता एकवटत असून संजय पाटील यड्रावकरांना शह देण्यासाठी गणपतराव पाटील, राजू शेट्टी, उल्हास पाटील आदींनी कंबर कसली आहे.
राजश्री शाहू परिवर्तन आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. सध्या त्या पद्धतीने नियोजन करण्याचे काम सुरू असून बैठकांना सुरुवात झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यड्रावकरांची ताकद कमी करून पालिकेवर आपणच राज्य करायचे, असा मनसुबा विरोधक व्यक्त करत आहेत. यड्रावकरांच्या गटाचे तिकीट मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे.
तिकीट वाटप करताना यड्रावकरांना डोकेदुखी ठरणार आहे. यड्रावकर आणि विरोधकांनी एकत्रित यावे आणि जयसिंगपूर नगरपालिका बिनविरोध करावी यादृष्टीने समाजातील काही घटकांनी प्रयत्न चालवले आहेत. जेणेकरून शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहे. पालिकेच्या प्रशासनातर्फे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्याचे काम सुरू आहे.
गतवेळच्या निवडणुकीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाल्यामुळे यड्रावकर गटाला मोठा धक्का बसला, पण बहुतांश नगरसेवक यड्रावकर यांचे असल्यामुळे पालिकेची सत्ता यड्रावकरांकडेच राहिली. त्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेमधील नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडे कारभार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जयसिंगपूरच्या मॉ डेल शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने लागेल ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिल्याने यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.