Election 2025: इचलकरंजीतील दिग्गज राजकीय नेते महायुतीच्या वाटेवर? गुप्त बैठकांची हालचाल
शहरातील महायुतीची ताकद अधिकच वाढणार आहे
इचलकरंजी : लवकरच येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. आगामी काळात अनेक दिग्गज राजकीय नेते महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत शहरातीलच एका मोठ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून काही जणांशी गुप्त बैठका होत असल्याचे समजते. यामुळे शहरातील महायुतीची ताकद अधिकच वाढणार आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लवकरच प्रभाग रचनाही जाहीर होणार आहेत. सध्या शहरातील काही पक्षांचे दिग्गज राजकीय नेते महायुतीच्या वाटेवर आहेत. हे नेते अनेक वर्षापासून त्यांच्या पक्षात कार्यरत आहेत, पण नाराजी, तत्कालीन नगरपालिकेत नेहमी विरोधात बसण्याची वेळ अथवा अन्य कारणांमुळे हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
यामध्येही प्रथम पसंती भाजप व त्यानंतर अन्य घटकपक्षांना दिली जात आहे. अशा नाराज काही नेत्यांशी महायुतीमधील एका वरिष्ठ नेत्याने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. या चर्चा जरी बंद खोलीत व यामधील तपशील जरी गुप्त असला तरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये प्रवेश अथवा महायुतीच्या उमेदवारांना आगामी काळात पाठिंबा देण्याबाबत विचारविनिमय झाल्याचे बोलले जात आहे.
नुकतीच भाजपच्या मंडल कार्यकारिणीच्या निवडी जाहीर झाल्या. या निवडी करताना आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना कशी करता येईल, याकडे लक्ष दिले असल्याचे दिसून येत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात महायुतीमध्ये शहरातील विविध पक्षांच्या दिग्गजांना प्रवेश करायला लावायचा अथवा आगामी काळात त्यांचा पाठिंबा मिळवायचा या दुहेरी धर्तीवर व्यूहरचना सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महायुतीच्या नेत्यांची शहरात ही चाल यशस्वी ठरल्यास आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचे पारडे अधिकच जड होणार आहे. यामुळे इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर, उपमहापौर हा महायुतीचाच करायचा, अशी केलेली घोषणा प्रत्यक्षात उतरण्यास मदत होणार आहे.
महायुतीत यापूर्वीच इनकमिंग सुरू
दोन ते तीन महिन्यांपासून महायुतीत इन्कमिंग सुरू झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे सरचिटणीस विठ्ठल चोपडे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे समजते. यामुळे महायुतीची ताकद आधीच वाढली आहे. पण यामध्ये समाधान न मानता जास्तीत जास्त प्रवेश महायुतीमध्ये कसे करून घेता येतील याकडे महायुतीतील नेत्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.