वयोवृद्धांना मिळणार घरपोच रेशन
अन्न सुविधा योजनेचा विस्तार वाढविण्याचा विचार
बेळगाव : घरोघरी रेशन पोहोचविणाऱ्या ‘अन्नसुविधा’ योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 75 वर्षांवरील वयोवृद्धांना घरबसल्या रेशन उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळात चर्चा करून कार्यवाही केली जाणार आहे. मागील वर्षापासून 80 वर्षांवरील वयोवृद्धांना घरोघरी धान्य पोहोचविण्यासाठी अन्न सुविधा लागू केली आहे. या योजनेचा विस्तार वाढवून 75 वर्षांवरील वयोवृद्धांना रेशन पोहोचविण्याचा मानस आहे. त्यामुळे वयोवृद्धांचे मासिक रेशन आणण्याचे कष्ट कमी होणार आहेत. अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारकांना मासिक 10 किलो तांदळाचे वितरण केले जात आहे.
प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ दिले जात आहेत. त्यामुळे सरकारने वयोवृद्धांसाठी घरबसल्या रेशन पुरवठा करण्याचा विचार चालविला आहे. रेशनसाठी बायोमेट्रिक आणि ई पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या मशीनवर अंगठा ठेवून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जाते. मात्र, वयोवृद्धांना रेशन देण्यासाठी घरी जाऊन अंगठा घ्यावा लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रेशनवरील निधीऐवजी अतिरिक्त धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना अतिरिक्त तांदूळ मिळू लागला आहे. दरम्यान, वयोवृद्ध लाभार्थ्यांना रेशन घेऊन जाणे त्रासाचे ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत सरकार 75 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी घरपोच रेशन देण्यासाठी विचार करीत आहे.