मोदींचा रिमोट अदानींच्या हातात : राहुल गांधी
मध्यप्रदेशच्या सतना येथे प्रचारसभा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मध्यप्रदेशच्या सतना येथे जाहीरसभा घेतली आहे. या सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रिमोट अदानींच्या हातात असल्याचा आरोप केला आहे. दोन प्रकारचे सरकार असते, यातील पहिले सरकार गरीबांच्या खिशात पैसे टाकते, तर दुसरे सरकार मोठमोठ्या उद्योजकांच्या खिशात पैसे टाकते. काँग्रेसने मनरेगा, अन्नसुरक्षेचा अधिकार दिला. तर भाजपने नोटबंदी, जीएसटी लादला, शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे आणले. हा भाजप अन् काँग्रेसमधील फरक असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेशचा पाया म्हणजे येथील शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, बेरोजगार युवा आहेत. या सर्वांना मागील 15 वर्षांमध्ये भाजपने उद्ध्वस्त केले आहे. मध्यप्रदेशात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही, यामुळे त्यांना कर्ज घ्यावे लागले. येथे 18 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
भाजप अदानींना पैसे देतो, अदानी तोच पैसा विदेशांमध्ये खर्च करतात. अदानी अमेरिका, दुबई, जपानमध्ये जाऊन घर खरेदी करतात. लोकांचा जीएसटीचा पैसा अदानींच्या खिशात जातो. मध्यप्रदेशातील छोटे व्यापारी, शेतकरी, मजूर भयभीत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे देशात केवळ गरीब ही एकच जात असल्याचे सांगत आहेत. मी जातनिहाय जनगणनेची मागणी केल्यानेच मोदींना जातींच विसर पडला असावा अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
मध्यप्रदेशात सरकार आमदार नव्हे तर येथील अधिकारी चालवितात. अर्थसंकल्पाचे सर्व निर्णय 53 अधिकारी घेतात. या 53 जणांमध्ये केवळ एक अधिकारी ओबीसी आहे आणि मोदी मध्यप्रदेशात ओबीसींचे सरकार असल्याचे सांगतात. ओबीसी समुदायाची भागीदारी केवळ 0.3 टक्के असल्याची बाब मोदी लपवू पाहत आहेत. याचमुळे ते कुठल्याही भाषणात जातनिहाय सर्वेक्षणाचा उल्लेख करत नाहीत. मोदींचा रिमोट अदानींच्या हातात आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस सत्तेवर येताच आम्ही सर्वप्रथम जातनिहाय सर्वेक्षण करविणार आहोत. तर केंद्रात सत्तेवर आल्यावर राष्ट्रीय जातनिहाय जनगणना करविण्यात येईल. यानंतरच प्रत्येक आदिवासी, सामान्य आणि ओबीसी समुदायाला त्यांची संख्या किती हे समजणार आहे. जातनिहाय जनगणना होत नाही तोवर मागास जातींना भागीदारी मिळणार नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.