केरळममध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू
दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे हाहाकार
वृत्तसंस्था
कोची
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. केरळममध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना घरे सोडून अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले. तसेच ठिकठिकाणी आलेल्या पूरामध्ये आठ जण बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त 13 जण जखमी झाले आहेत. या आपत्तीमुळे 27 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर इतर 196 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. परिस्थितीला प्रतिसाद म्हणून 5,792 लोकांना सुरक्षित स्थळी हलवून राज्यभरातील 209 मदत शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन हे राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत विविध जिह्यांचे प्रभारी मंत्री आणि जिल्हा प्रशासनांच्या सतत संपर्कात आहेत. रविवारी दिवसभर पावसाचा जोर किंचित कमी झाला असला तरी पूराच्या संकटातून अजून लोकांना पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही. पूरग्रस्त भागांमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस, पंपा नदीला आलेला पूर आणि भूस्खलनाच्या शक्यतेमुळे परिसरात सुरक्षा सतर्कता जारी करण्यात आली आहे.