चार गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न
कोल्हापूर :
कोल्हापूर शहर हद्दवाढीचा 17 गावांसह दोन एमआयडीसींचा समावेश करण्याची मागणी करणारा आतापर्यंतचा आठवा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला आहे. महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. शहराला खेटून असलेल्या चार गावांचा समावेश करुन हद्दवाढ करण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. आमदार राजेश क्षीरसागर हे निवडणुकीपूर्वी हद्दवाढ करण्यासाठी आग्रही असल्याने शहरवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याचे संकेत मिळाल्यापासून हद्दवाढीच्या मुद्याने उचल खाल्ली आहे. हद्दवाढ समर्थक कृती समितीने यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. तर प्रास्ताविक ग्रामस्थांचा हद्दवाढीला मोठा विरोध आहे. हद्दवाढ विरोधी कृती समितीनेही हद्दवाढ नको यासाठी आंदोलन आणि प्रति आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीचा आतापर्यतचा आठवा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात शासनाला पाठवला आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शहराची हद्दवाढ झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
- म्हटल तर एका दिवसात
एखाद्या शहराची हद्दवाढ करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया नाही. नगरविकास विभागाचा हद्दवाढीचा एक अध्यादेश यासाठी पुरेसा आहे. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन शहराची हद्दवाढ केली जाते. शहराची हद्दवाढ करण्यासाठी म्हटल तर एक दिवस पुरेसा आहे.
- आठ वेळा प्रस्ताव
कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा, अशी मागणी करणारा 42 गावांचा समावेशाचा पहिला प्रस्ताव 24 जुलै 1990 रोजी पाठवला होता. त्यानंतर 20 मार्च 1992 राजी प्राथमिक अधिसूचनाही काढली होती. मात्र गावकरी आणि काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे निर्णय झाला नाही. यानंतर राज्य शासनाच्या सुचनेनुसार महापालिकेने 18 मार्च 2002 रोजी मुळ प्रस्तावातील नागरिकरणाचा आणि लोकसंख्येचा वेग कमी असेली 25 गावे वगळून उर्वरीत 15 गावे व दोन एम.आय.डी.सी.सह एकूण 17 गावांचा सुधारीत हद्दवाढ प्रस्ताव पाठवला होता. हाच पुन्हा प्रस्ताव 2012 मध्ये सादर केला होता. मात्र हद्दवाढीचा निर्णय झालाच नाही. महापालिकेने शहरालगतची 18 गावांसह दोन एमआयडीसींचा समावेशाचा प्रस्ताव 12 जून 2015 ला पुन्हा पाठवला. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2021 आणि 2 फेब्रुवारी 2022 तसेच 29 नोव्हेंबर 2023 असे सलग तीन वर्षे हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. आता पुन्हा 18 फेब्रुवारीला हद्दवाढीचा प्रस्ताव महापालिकेनं आठव्यांदा सादर केला आहे.
- यातील चार गावांचा समावेश शक्य
कळंबा, पाचगांव, गांधीनगर, वळीवडे, मोरेवाडी, कंदलगाव, उंचगाव उजळाईवाडी यापैकी चार गावांचा पहिल्या टप्प्यात शहरात समावेश होऊ शकतो.
- निवडणुकीपूर्वी शहराची हद्दवाढ
शहराच्या सर्वांगिन विकासासाठी हद्दवाढ होणे गरजेचं आहे. मागील अनेक वर्षापासून हद्दवाढीसाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे हद्दवाढीसाठी पाठपुरावा करणार आहे. शहराच्या विकासासाठी कटिबध्द असून हद्दवाढ होईल याची खात्री आहे.
- आमदार राजेश क्षीरसागर