शेतवडीत पाणी साचल्याने भात उगवणीवर परिणाम
नंदगड, हलशी, बिडी भागातील परिस्थिती
वार्ताहर /नंदगड
नंदगड, हलशी, बिडी, हलगा परिसरात जून महिन्याच्या 5 तारखेपासून संततधार पाऊस झाला. आठवडाभर पडलेल्या पावसाने शेतवडीत पाणी साचले. यामुळे शेतात पेरलेले भात कुजले. याचा परिणाम शेतीवाडी ओसाड पडली आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचा प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. या भागातील शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतात पेरणी करतात. भात हे या भागातील प्रमुख पीक आहे. निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांची गुजराण शेतात मिळणाऱ्या भात पिकावरच आहे. त्यामुळे घरातील सर्व लोक वर्षभर शेतात काबाडकष्ट करून भाताचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करतात. यावर्षीही नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात भाताची पेरणी केली होती. पेरलेले भात जमिनीवर उगवून येणे अत्यावश्यक होते. परंतु भात उगवून येण्यापूर्वीच ढगफुटीसदृष्य मोठा पाऊस झाला. यामुळे शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आठवडाभर पाणी शेतवडीत साचून राहिल्याने भात पूर्णत: कुजून गेले. गेल्या दोन दिवसांपासून तरु पेरणीच्या लगबगीत शेतकरी व्यस्त आहेत. तर काही शेतकरी दुबार पेरणी करण्याच्या विचारात आहेत.