वाढत्या विमान प्रवासी संख्येमुळे अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
पोलीस दलासह इतर सुरक्षा विभागांचा सहभाग : कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर महिन्यात 40 हजारांच्या आसपास प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षेमध्ये बदल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अधिकारीवर्गाची बैठक पार पडली. सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. बेळगावमधून विमानफेऱ्या वाढल्या असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रत्येक प्रवाशाची व त्यांच्या साहित्याची तपासणी करूनच विमानामध्ये चढण्याची परवानगी दिली जाते. यासाठी पोलीस तसेच इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते. सध्या विमानतळावर राज्य पोलीस दलासोबत इतर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सध्या दिल्ली येथून बोइर्गिं विमान बेळगावला येत असल्याने दररोज शंभर प्रवासी दाखल होतात, तर तितकेच प्रवासी दिल्लीच्या दिशेने रवाना होतात. त्यामुळे एकाचवेळी विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना सुरक्षा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. यासंदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विमानतळ संचालक त्यागराजन, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विभागाच्या उपसंचालकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. सुरक्षेसंदर्भात अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.